मृग नक्षत्रातील पहिल्या दमदार पावसाने नागरिकांना दिलासा
नांदेड (प्रतिनिधी)- 7 जून रोजी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास मृग नक्षत्रातील पहिल्या पावसाने जोरदार हजेरी लावत नागरिकांना मोठा दिलासा दिला. गेल्या दोन महिन्यांपासून कडक उन्हामुळे आणि वाढत्या तापमानामुळे नागरिक त्रस्त झाले होते. उकाडा, उष्णतेच्या लाटा आणि पाण्याची वाढती चिंता यामुळे सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. अशा परिस्थितीत झालेल्या या दमदार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
पावसाला सुरुवात होताच आकाशात गडगडाट आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. त्याचबरोबर जोरदार वाऱ्यानेही हजेरी लावली. काही वेळातच पावसाचा वेग वाढल्याने रस्त्यांवर पाणी साचले. अनेक नागरिकांना पावसापासून बचाव करण्यासाठी दुकाने, कार्यालये आणि इतर सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला. मात्र या गैरसोयीपेक्षा पावसाने दिलेला दिलासा अधिक महत्त्वाचा असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
शेतकरी वर्गालाही या पावसामुळे आशेचा किरण दिसू लागला आहे. खरीप हंगामाच्या तयारीसाठी आणि पेरण्यांच्या नियोजनासाठी हा पाऊस महत्त्वाचा मानला जात आहे. नागरिकांनी निसर्गाचे आभार व्यक्त करत, आगामी काळातही पावसाने नियमित आणि संतुलित स्वरूपात बरसावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. बळीराजाला आवश्यक त्या वेळी पुरेसा पाऊस मिळाला तरच आजचा दिलासा आणि आनंद अधिक वृद्धिंगत होईल, असे मतही अनेकांनी व्यक्त केले.
