नांदेड (प्रतिनिधी) नांदेड शहरातील गुरुद्वारा परिसरातील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या अबचल नगर कमान ते यात्री निवास चौक दरम्यानच्या रस्ता कामात गेल्या ८ ते १० महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात दिरंगाई होत आहे. तसेच नव्याने टाकण्यात आलेली ड्रेनेज लाईन चौक-अप (सुरू होण्यापूर्वीच तुंबणे) झाल्यामुळे नागरिकांना व वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला स्मरणपत्र देऊन प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
या रस्त्यावर सचखंड पब्लिक स्कूल, दशमेश हॉस्पिटल, खालसा हायस्कूल यांसारख्या प्रमुख संस्था तसेच अबचल नगर कॉलनी, भगतसिंग रोड, बडपुरा, चिखलवाडी, शहीदपुरा या दाट लोकवस्तीच्या भागातील हजारो विद्यार्थी, रुग्ण आणि नागरिकांची दररोज मोठी रहदारी असते. पावसाळ्याचे दोन महिने उलटूनही कंत्राटदाराने काम पूर्ण केलेले नाही. रस्त्यावर ठिकठिकाणी २ ते ३ फुटांचे खड्डे पडले असून त्यात दररोज वाहने अडकत आहेत.
महानगरपालिका प्रशासनाचे या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत आणि निकृष्ट दर्जाच्या ड्रेनेज लाईन कामाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी जगदीप सिंघ नंबरदार, हरभजन सिंघ पुजारी, गुरुसेवक सिंघ कारागीर, गुरबच्चन सिंघ कारागीर, भाग सिंघ,बचन सिंघ सरदार यांच्यासह परिसरातील नागरिकांनी मागणी केली आहे.
