अर्धापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील आंबेगाव शेतशिवार परिसरात फिर्यादीची चारचाकी गाडी अडवून मोबाईल फोन व रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेत मारहाण केल्याची घटना २६ मे रोजी रात्री घडली. या प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ मे २०२६ रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास आंबेगाव शेतशिवार, ता. अर्धापूर येथे आरोपी दिगांबर अशोकराव मगरे (वय २९), यशराज लक्ष्मण तुंगेवाड (वय २१) व परमेश्वर गोविंद शिंदे (रा. लहाण, ता. अर्धापूर) यांनी संगनमत करून फिर्यादीची चारचाकी गाडी अडवली. त्यानंतर फिर्यादी व साक्षीदार यांच्या खिशातील मोबाईल फोन तसेच पाच हजार रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. आरोपींनी फिर्यादीस मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी भगवान विश्वनाथ सोळंके (वय ३३, रा. कृष्णापूर, ता. हदगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २७६/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०९(६), ३५२, ३५१(२), ३(३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक भोसले करीत आहेत.
