कुंटूर (प्रतिनिधी) – नायगाव तालुक्यातील ईकळीमाळ येथे अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १० मे २०२६ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.
या प्रकरणी माधव शेषेराव जाधव, प्रेमला महादेव पवार, रामेश्वर बालाजी पुयड, किसनाबाई बालाजी पुयड, बालाजी कोंडीबा पुयड यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असूनही संगनमत करून विवाह लावण्यात आल्याचा आरोप आहे. याबाबत विद्या लक्ष्मणराव मोरे (वय ३८), व्यवसाय ग्रामपंचायत कार्यालय, ईकळीमाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुंडूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२६/२०२६ नोंद करण्यात आला आहे. आरोपींवर बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ अंतर्गत कलम ९, १०, ११ तसेच बीएनएस-२०२३ च्या संबंधित कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार पवार करीत आहेत.
