नांदेड (प्रतिनिधी)- मुरमुरा गल्ली येथे ४ मार्चच्या रात्री घडलेल्या खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोन आरोपी भावांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी दोघांना १० एप्रिल २०२६ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ४ एप्रिल रोजी रात्री सुमारे ११.१५ वाजण्याच्या सुमारास मुरमुरा गल्ली परिसरात जुना वाद उफाळून आल्याने भांडण विकोपाला गेले. परमज्योतसिंघ परविंदरसिंघ कांचवाले (वय २५) व त्याचा भाऊ मनप्रीतसिंघ परविंदरसिंघ कांचवाले (वय २३) यांनी जुन्या वैमनस्यातून रणजीत सिंघ तबेलेवाले उर्फ रज्या (वय ४०) याच्यावर तलवारीने हल्ला केल्याचा आरोप आहे. या गंभीर हल्ल्यात रणजीतसिंघ तबेलेवाले यांचा मृत्यू झाला. हा वाद पूर्वीपासून सुरू असल्याची माहिती समोर येत असून, त्या रात्री नेमके काय घडले याबाबत तपास सुरू आहे.
मृताची पत्नी गुरुप्रीत कौर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वजीराबाद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू वटाणे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपी परमजीत सिंह व मनप्रीत सिंह या दोघांना आज न्यायालयात हजर करण्यात आले असता, तपासाची प्रगती लक्षात घेऊन न्यायालयाने त्यांना १० एप्रिल २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीसांकडून पुढील तपास सुरू असून, घटनेमागील नेमके कारण व इतर बाबींचा शोध घेतला जात आहे.
संबंधित बातमी ….
