नांदेड (प्रतिनिधी) मुलगा होत नाही, मुलीच होतात, तसेच कंपनी सुरू करण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये, या कारणावरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून मारहाण केल्याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 मार्च 2018 ते 7 ऑगस्ट 2026 या कालावधीत टायरबोर्ड कमान, देगलूर नाका, नांदेड परिसरात हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. आरोपींनी संगनमत करून फिर्यादीचा छळ केला. फिर्यादीला मुलगा होत नाही, मुलीच होतात, असे म्हणत तसेच कंपनी सुरू करण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी करून शारीरिक व मानसिक त्रास देत मारहाण केल्याचा आरोप आहे.याशिवाय गुप्तधन काढण्यासाठी दोन मुलींची नरबळी देऊ, असे सांगून फिर्यादीने आपल्या मुलींचा बळी देण्यास विरोध केल्यावर तिला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी उम्मे ऐमन मोहम्मद वसीम अक्रम, वय 28 वर्षे, रा. टायरबोर्ड कमान, देगलूर नाका, नांदेड यांच्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा क्र. 948/2026 दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS)-2023 मधील कलमे 85, 115(2), 352, 351(2)(3), 3(5) तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोहेकॉ/कानगुले करीत असून, पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणात मोहमद वसीम अकरम अब्दुल वाहिद, आफरिन बेगम इम्रान मोमीन, मोहमद इम्रान दोघे रा मालटेकडी नांदेड, बिबी तबसूम शाहेद जहागीरदार, शाहेद जहागीरदार, दोघे रा. हतई नांदेड, अब्दुल वासे अब्दूल वाहिद, रखीब अब्दुल वाहिद, दोघे रा कुंभार टेकडी नांदेड, गौस बाबा, रा वसमत, हाफेज जब्बार, अकोला अश्या ९ लोकांची नावे आरोपी सदरात नमूद आहे.
