बिलोली (प्रतिनिधी)- दुसऱ्याला न्याय देणाऱ्याच्या नशिबात जेव्हा स्वतःचा निकाल लागतो, तेव्हा तो अधिक बोचरा असतो, याची प्रचिती नुकतीच नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथे आली आहे. न्यायदानाच्या पवित्र खुर्चीवर बसून जर चुकीची कामे नडणार असतील, तर कायदा कोणालाही सोडत नाही, हेच बिलोलीच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीशांच्या गच्छंतीवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, बिलोली येथील जिल्हा न्यायाधीश हेमंत सुरेश सातभाई यांची विकेट पडल्याची जोरदार चर्चा सध्या न्यायविभागात रंगली आहे. एप्रिल २०२६ मध्ये त्यांची बदली होऊन ते बिलोली येथे रुजू झाले होते, मात्र त्यांच्या मुंबई येथील कार्यकाळातील काही प्रकरणांची चौकशी उच्च न्यायालयाच्या दक्षता विभागाकडून सुरू होती,म्हणे. ज्या हातांनी न्यायाचा तराजू सुस्थितीत ठेवायचा, त्याच हातांबाबत जेव्हा चौकशी सुरू होते, तेव्हा त्याचा शेवट काय होतो, हे आज बिलोलीच्या जनतेने पाहिले.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नरेंद्र ब्रम्हे यांनी अचानक बिलोली न्यायालयात भेट दिली आणि त्यानंतर हेमंत सातभाई यांना थेट घरचा रस्ता दाखवण्यात आला. विशेष म्हणजे, न्यायालयीन कामकाज सुरू असतानाच अशा प्रकारे न्यायाधीशांना घरी पाठवण्याची ही नांदेड जिल्ह्यातील पहिलीच वेळ नाही; यापूर्वीही अनेक अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांचे मुखवटे अशाच चौकशीत उतरले आहेत.
न्याय प्रक्रियेत पारदर्शकता अपेक्षित असताना, जेव्हा एखादा न्यायाधीशच चौकशीच्या कचाट्यात सापडतो, तेव्हा ती संपूर्ण न्यायव्यवस्थेसाठी एक मोठी चपराक असते. न्यायदान प्रक्रियेत चुकीची कामे केली की ती शेवटी नडतातच,हा संदेश या कारवाईतून स्पष्ट झाला आहे. खुर्ची कायमची नसते, पण त्या खुर्चीचा सन्मान राखणे ज्यांना जमले नाही, त्यांना अशा प्रकारे बाद व्हावे लागणे, हे अत्यंत दुर्दैवी आणि संबंधित यंत्रणेसाठी डोळे उघडणारे आहे.
