*मराठी भाषा संवर्धनासाठी जिल्हा मराठी भाषा विकास केंद्र स्थापन केले जाणार* नांदेड (प्रतिनिधी)- मराठी भाषेचे संवर्धन, जतन, विकास आणि प्रसारासाठी शासन विविध उपक्रम राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हा मराठी भाषा विकास केंद्र स्थापन करण्यात येणार असून, या केंद्रामार्फत मराठी भाषेच्या संवर्धनाशी संबंधित विविध उपक्रमांचे नियोजन, समन्वय, नियमन आणि नियंत्रण केले जाणार आहे. यासाठी या केंद्रात मराठी भाषा अधिकारी यांचीही नियुक्ती करण्यात येणार आहे. या माध्यमातून मराठी भाषेच्या विकासाला अधिक गती मिळणार असल्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात उद्योग डॉ. उदय सामंत यांनी आज जिल्ह्यातील साहित्यिकांशी संवाद साधला. यावेळी आमदार बालाजी कल्याणकर, आमदार बाबुराव कोहळीकर, आमदार आनंदराव बोंढारकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदिप गायकवाड, साहित्यिक श्रीकांत देशमुख, आदींसह ज्येष्ठ साहित्यिक, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. प्रारंभी डॉ. सामंत यांनी मराठी भाषा संवर्धन, जतन आणि जागतिक स्तरावर प्रसार करण्यासाठी शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर त्यांनी उपस्थित साहित्यिक, लेखक आणि मराठी भाषा अभ्यासकांशी मुक्त संवाद साधत मराठी भाषेच्या जतन, संवर्धन आणि प्रसाराबाबत त्यांच्या अपेक्षा, सूचना व मागण्या जाणून घेतल्या. साहित्यिकांनी मांडलेल्या सर्व सूचना आणि मागण्यांची शासन सकारात्मक दृष्टीने निश्चितच दखल घेईल. तसेच संबंधित प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही डॉ. सामंत यांनी यावेळी दिली. ते म्हणाले की, मराठी भाषेला केंद्र शासनाकडून अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे ही मराठी भाषेसाठी ऐतिहासिक बाब ठरली आहे. मराठी भाषेला जागतिक स्तरावर कायमस्वरूपी अधिष्ठान मिळावे, या उद्देशाने लंडन येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी भाषा केंद्रा’साठी भव्य इमारत खरेदी करण्यात आली आहे. या इमारतीच्या खरेदीसाठी महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागामार्फत पाच कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. या केंद्राच्या माध्यमातून मराठी भाषा शिक्षण, संशोधन, साहित्य प्रसार, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच जागतिक स्तरावरील मराठी उपक्रमांना नवे व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, ऐरोली (नवी मुंबई) येथे मराठी भाषा विभागाचे उपकेंद्र स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत भूखंड उपलब्ध करून देण्यात आला आहे. मुंबई येथे उभारण्यात येणाऱ्या भव्य आणि आधुनिक मराठी भाषा भवनाचे कामही प्रगतीपथावर असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात प्रत्येक विभागीय स्तरावर तसेच जिल्हास्तरावर मराठी भाषा विकास केंद्र स्थापन करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. आगामी काळात मराठी भाषेचे जतन, संवर्धन, प्रचार आणि प्रसार अधिक प्रभावीपणे करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, असेही डॉ. सामंत यांनी स्पष्ट केले. राज्यातील अमराठी नागरिकांनाही मराठी भाषा सहज शिकता यावी, यासाठी शासनाने विशेष उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत सुमारे 70 हजार अमराठी नागरिकांना मराठी भाषा विभागामार्फत मराठी शिकविण्यात यश आले आहे. याशिवाय, अमराठी भाषिकांना मराठी भाषा अधिक सुलभपणे शिकता यावी आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी, यासाठी मराठी भाषा विभागाच्यावतीने लवकरच मराठी भाषा शिकण्यासाठी मोबाईल ॲप विकसित करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. मराठी साहित्यिकांना अधिक प्रोत्साहन मिळावे, यासाठी साहित्य क्षेत्रातील पुरस्कारांमध्येही वाढ करण्यात येईल, अशी ग्वाही उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली. शेवटी आभार जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी मानले. Kanthak Suryatal Post Views: 444 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अभिजीत दीपिकेला त्वरित अटक करण्यासाठी नवीन अंसारी बाण आम्ही देशद्रोही कसे? – फरहनाज आणि नूतन टोप्पोची अंगावर काटा आणणारी आपबिती!