नांदेड (प्रतिनिधी) – शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून मारहाण व धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या जय महाराष्ट्र ढाब्याच्या मालकाला जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवत सहा महिन्यांच्या सक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे, तर त्याच्या दोन मुलांना परिविक्षेवर सोडण्याचा आदेश दिला आहे.
प्रकरणानुसार, १८ डिसेंबर २०२१ रोजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी गंगाधर पाटील व इतर पोलीस कर्मचारी वरिष्ठांच्या आदेशानुसार बोंडार बायपास व काकांडी परिसरात अवैध दारू, गुटखा आणि मटका व्यवसायांवर कारवाईसाठी गस्त घालत होते. यावेळी काकांडीजवळील जय महाराष्ट्र ढाब्यावर तपासणी सुरू असताना ढाबा मालक व त्याच्या दोन मुलांनी पोलिसांशी वाद घालत अश्लील शिवीगाळ, मारहाण आणि धक्काबुक्की केली. या घटनेत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला होता.
या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात बालाजी संभाजी पांचाळ, ओमकार बालाजी पांचाळ आणि अविनरुद्ध बालाजी पांचाळ यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३५३, ३३२ आणि ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास पूर्ण झाल्यानंतर दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले. खटल्यादरम्यान एकूण सात साक्षीदारांची साक्ष आणि वैद्यकीय पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आले.
पुराव्यांच्या आधारे जिल्हा न्यायाधीश टी. एस. सोलंकर यांनी आरोपी बालाजी संभाजी पांचाळ याला कलम ३५३ अंतर्गत दोषी ठरवत सहा महिन्यांच्या सक्त कारावासाची व एक हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास आणखी ४५ दिवसांचा कारावास भोगावा लागणार आहे. तर ओमकार आणि अविनरुद्ध पांचाळ यांना कलम ३२३ अंतर्गत दोषी ठरवत परिविक्षेचा लाभ देण्यात आला.
या खटल्यात अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पी. व्ही. बुलबुले यांनी सरकार पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडली. तपास अधिकारी गणेश होळकर तसेच नांदेड ग्रामीण पोलिसांच्या न्यायालयीन पथकानेही खटल्याच्या यशस्वी पैरवीसाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
