नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) प्रभारी पदावर झालेल्या नियुक्तीवरून वाद निर्माण झाला असून, या संदर्भात शासनाकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या नियुक्ती प्रक्रियेत नियमबाह्य बाबी झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.या तक्रारींवर ऍड. विजय पाटील असे नाव लिहिलेले दिसते आहे.तसेच हे पत्र मुंबई येथे मंत्रालयाच्या मुख्य टपाल कार्यालयात २८ एप्रिल २०२६ रोजी बाय हॅन्ड देण्यात आले आहे.
तक्रारीनुसार, संबंधित अधिकाऱ्यांची स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रभारी पदावर नियुक्ती करताना शासनाच्या नियमावलीचे पालन करण्यात आले नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच, संबंधित अधिकाऱ्यांची सेवाकाळ, अनुभव आणि पात्रता यांचा विचार न करता ही नियुक्ती करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याशिवाय, संबंधित अधिकारी यांचा कार्यकाळ पूर्ण न होता त्यांना महत्त्वाच्या पदावर नेमण्यात आले असून, यामागे राजकीय दबाव किंवा इतर कारणे असू शकतात, अशी शंका व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून नियुक्ती रद्द करावी, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
तक्रारीत पुढे म्हटले आहे की, नांदेड जिल्ह्यात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून, अशा परिस्थितीत स्थानिक गुन्हे शाखेसारख्या महत्त्वाच्या विभागावर सक्षम आणि अनुभवी अधिकाऱ्याची नियुक्ती होणे अत्यावश्यक आहे. मात्र, सध्याची नियुक्ती ही नियमबाह्य असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान, या तक्रारीची दखल घेऊन गृह विभागाकडून लवकरच निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणामुळे पोलिस प्रशासनातही चर्चांना उधाण आले असून, पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मंत्रालयाचा निर्णय वेटिंगमध्ये… पण दरवाढ मात्र फास्ट ट्रॅकवर!
राज्याच्या नवीन मंत्रालयातून नेमका निर्णय कधी बाहेर पडणार याची कुणालाच खात्री नाही. मंत्रालयात फायलींची यात्रा अजूनही चहाच्या कपाभोवती, बैठकीच्या अजेंड्याभोवती आणि पुढच्या बैठकीत चर्चा करू या ऐतिहासिक वाक्याभोवती फिरत आहे. पण आश्चर्य म्हणजे निर्णय अजून जन्माला आलेला नसतानाच दरवाढ मात्र पूर्ण वाढून घराघरात पोहोचली आहे. म्हणजे बाळ अजून पोटात आणि नावकरण सोहळा आधीच उरकलेला अशी विदर्भातील सध्याची परिस्थिती झाली आहे.
नांदेडात सध्या सर्वात मोठा प्रश्न असा आहे की दरवाढ नेमकी कोणत्या कारणासाठी होणार? कारणांची यादी मात्र मंत्रालयाच्या फाईलपेक्षा मोठी आहे. काहीजण सांगतात जागतिक संकट, काहीजण म्हणतात तेल संकट, तर काहींच्या मते देवानेही आता अर्थव्यवस्थेकडे पाहून हात वर केले आहेत. जगात संकट आहे हे वाक्य इतक्या वेळा ऐकू येत आहे की लोकांना आता वाटू लागले आहे संकट जगात आहे की फक्त बिलावर? माहिती देणारेही आता मोठ्या आत्मविश्वासाने सांगतात दर वाढणारच! मात्र त्यांना विचारले की कधी, किती आणि का? तर उत्तर मिळते, अहो वरून आदेश येणार आहेत. वर म्हणजे मंत्रालय, मंत्रालयाच्या वर समिती, समितीच्या वर तज्ञ, आणि तज्ञांच्या वर परिस्थिती. परिणामी नागरिक मात्र खाली बसून दरवाढीचा हिशोब करत आहेत.
विशेष म्हणजे माहिती देणाऱ्यांना स्वतःलाही रोज फोन करून खात्री करावी लागते की काल सांगितलेली माहिती आजही खरी आहे का. कारण माहितीची शाश्वती नसली तरी अफवेचा वेग मात्र 5G पेक्षाही जास्त आहे. काल पेट्रोल, आज गॅस, उद्या वीज आणि परवा कदाचित श्वास घेण्यावरही परिस्थितीजन्य शुल्क लागू होईल, अशी भीती सामान्य माणसाच्या मनात निर्माण झाली आहे. दरवाढीचे स्पष्टीकरणही फार रंजक आहे. कुणी सांगतं आंतरराष्ट्रीय बाजार वाढला. कुणी म्हणतं डॉलर मजबूत झाला. तर कुणी थेट सांगतं जागतिक परिस्थिती गंभीर आहे.ही परिस्थिती इतकी गंभीर आहे की तिचे नेमके स्वरूप कुणालाच समजत नाही; पण दरवाढीचा परिणाम मात्र काहींच्या खिशाला अगदी स्पष्टपणे समजतो.
दरम्यान काही येल्लो जर्नालिस्ट पदवी देण्याचे तज्ज्ञ असणाऱ्यांनी तर दरवाढीचे भविष्य आधीच लिहून ठेवले आहे. त्यांच्या मते, दर वाढणे ही आता आर्थिक प्रक्रिया नसून परंपरा बनली आहे. जसं सण आले की सेल लागतो, तसं महिना सुरू झाला की दर वाढतात. नागरिकांनीही आता मानसिक तयारी करून ठेवावी कारण दरवाढ ही अचानक नसते, ती हळूहळू सवय बनते. मंत्रालय निर्णय घेईल तेव्हा घेईल; पण बाजाराने निर्णय आधीच घेतलेला दिसतो. सरकार म्हणतं परिस्थिती पाहू, तज्ञ म्हणतात अभ्यास करू, अधिकारी म्हणतात प्रस्ताव तयार आहे, आणि नागरिक म्हणतो बिल आधीच वाढलं!
अखेर प्रश्न एकच उरतो निर्णय आधी होतो की दरवाढ आधी? विदर्भात तरी उत्तर स्पष्ट आहे: निर्णय येण्याआधीच दरवाढ येते. कारण आपल्या व्यवस्थेत निर्णय हा विचारांचा विषय असतो, पण दरवाढ ही कृतीचा!आता जनता फक्त एवढीच वाट पाहतेय मंत्रालयातून एखादा निर्णय येईल की दरवाढीवरही दरवाढ जाहीर होईल? तोपर्यंत नागरिकांनी संयम ठेवावा, पाकीट घट्ट धरावं आणि बातम्या ऐकताना हसावं… कारण परिस्थिती गंभीर असली तरी व्यंगात्मक हास्य अजून करमणूक करायला जिवंत आहे
