भालकी येथे २४ नागरिकांचा थरारक बचाव

नांदेड– तालुक्यातील भालकी परिसरात सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे आसना नदी व नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला. या पुराच्या पाण्यामुळे मौजे भालकी शिवारातील शेतांमधील आखाड्यावर तब्बल २४ नागरिक अडकून पडले होते. त्यामध्ये ३ लहान मुले, ८ महिला आणि १३ पुरुष यांचा समावेश होता.

 

घटनेची माहिती प्रशासनाला मिळताच माननीय उपविभागीय अधिकारी सचिन खल्लाळ व तहसीलदार संजय वारकड यांनी प्रसंगावधान दाखवत तातडीने एसडीआरएफ (State Disaster Response Force) पथकाला संपर्क केला. तात्काळ दोन बोटींसह एसडीआरएफचे जवान घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक प्रशासन व ग्रामस्थांच्या मदतीने रात्री उशिरा अंधारात तब्बल दहा वाजेपर्यंत चाललेल्या थरारक रेस्क्यू ऑपरेशननंतर सर्व २४ नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. या प्रसंगी आमदार बालाजी कल्याणकर हे देखील घटनास्थळी उपस्थित होते.

 

बचावकार्य संपल्यानंतर सर्व नागरिकांना सुरक्षित निवारा केंद्रावर नेण्यात आले. तेथे त्यांच्यासाठी जेवण व झोपण्याची योग्य सोय प्रशासनाच्यावतीने करण्यात आली.

 

या धाडसी बचावकार्यात एसडीआरएफ पथकासोबत स्थानिक अधिकारी व ग्रामस्थांनीही सक्रिय सहभाग नोंदविला. यामध्ये मंडळ अधिकारी तरोडा शिवानंद स्वामी, मंडळ अधिकारी कुणाल जगताप, तलाठी गोपीनाथ कल्याणकर, अविनाश करंदीकर, कृषी सहाय्यक वसंत जारिकोटे, तसेच प्रभाकर शेजुळे (सरपंच चिखली बुद्रुक), राजू धाडवे (सरपंच भालकी), गणेश धाडवे, लक्ष्मण कल्याणकर व समस्त गावकऱ्यांनी मोठी मदत केली.

प्रशासनाच्या तात्काळ प्रतिसादामुळे आणि ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे मोठा अनर्थ टळला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!