कॉपी-पेस्ट पत्रकारिताचा नवा अध्याय : जबाबदारीची लक्तरे वेशीवर, आणि सत्याचा अंत्यसंस्कार!
नांदेड (प्रतिनिधी)- ब्रेकिंगच्या नादात काही पत्रकार आणि वृत्तवाहिन्या इतक्या बेभान झाल्या आहेत की, सत्य पडताळण्यापेक्षा दुसऱ्याची अब्रू कशी वेशीवर टांगता येईल, याचीच स्पर्धा सुरू असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. काही तासांपूर्वीच खरी बातमी द्या, फुगवटा करू नका असा उपदेश देणाऱ्या मंडळींच्याच अंगणात आता ढोंगी पत्रकारितेचा फटाका फुटला आहे.
नांदेड येथील एनडीटीव्ही मराठीचे संचालक योगेश लाठकर यांच्या माध्यमातून प्रसारित झालेल्या एका बातमीने आधीच प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. कोणाळे कोचिंग क्लासेस यांची प्रतिमा मलीन करणारी ही बातमी कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय दाखवण्यात आली. सीबीआय, गुन्हा, कारवाई अशा शब्दांचा मसाला टाकून बातमीला इतका तडका देण्यात आला की, जणू काही न्यायालय, तपास यंत्रणा आणि निकाल सर्व काही स्टुडिओतच उरकण्यात आले!
विशेष म्हणजे, काही वेळानंतर एनडीटीव्ही मराठीने ती बातमी शांतपणे हटवली. पण इथेच खरी करमणूक सुरू झाली. एकाला ठेच लागली तर दुसऱ्याला शहाणपण येते असे म्हणतात; मात्र येथे तर दुसऱ्याने ठेच लागलेल्या दगडालाच उचलून पुन्हा स्वतःच्या पायावर मारून घेतले. लोकशाही वृत्तवाहिनीने तीच बातमी अक्षरशः कॉपी-पेस्ट करून जलद बातम्या मध्ये झळकावली आणि पत्रकारितेच्या नावाखाली चालणारा हा फॉरवर्ड करा आणि प्रसिद्ध करा उद्योग पुन्हा उघड झाला.
लोकशाही वृत्तवाहिनीचे नांदेडमधील सर्वेसर्वा श्री. कमलाकर बिरादार पाटील यांच्याबद्दल जनतेत आदर आहे. पत्रकारितेत त्यांचा दबदबा मान्य केला जातो. पण अशा अनुभवी व्यक्तिमत्त्वाच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या माध्यमातूनच पडताळणी शिवाय खोटी, दिशाभूल करणारी आणि एखाद्या संस्थेची प्रतिष्ठा धुळीस मिळवणारी बातमी प्रसारित होणे, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.काही खात्रीलायक सूत्र सांगतात की,कौठच्या पलीकडे एका गुप्त जागी बसलेले असतांना कमलाकर बिरादार पाटील यांनी एनडीटीव्हीची बातमी कॉपी पेस्ट करून पाठवल्याने हा उत्कृष्ट बातमी आउटलेट तयार झालेला आहे.
खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कवठाच्या पलीकडे एखाद्या “गुप्त अड्ड्यावर” बसून मोबाईलवर आलेल्या अर्धवट माहितीतून ही बातमी तयार करण्यात आली. ना अधिकृत कागदपत्र, ना तपास, ना संबंधितांची बाजू फक्त कॉपी, पेस्ट आणि प्रसारित! पत्रकारिता आता फिल्ड रिपोर्टिंग वर नाही तर व्हॉट्सअॅप विद्यापीठावर चालते, याचे हे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल.
आज प्रश्न फक्त एका कोचिंग क्लासच्या बदनामीचा नाही. प्रश्न आहे पत्रकारितेच्या उरलेल्या विश्वासार्हतेचा. एखाद्याच्या प्रतिष्ठेवर चिखलफेक करणे इतके सोपे झाले आहे की, ब्रेकिंग न्यूज च्या नावाखाली कोणाच्याही आयुष्याची राखरांगोळी केली जाते आणि नंतर एक छोटीशी बातमी हटवली एवढ्यावर प्रकरण मिटवले जाते.
२८ मे २०२६ रोजी सकाळी ८:४५ वाजता प्रसारित झालेल्या या वृत्तामुळे आता संबंधित वृत्तवाहिन्याच चौकशीच्या कक्षेत आल्या आहेत. चुकीच्या बातम्या देणाऱ्यांवर केवळ कारवाईच नव्हे, तर सार्वजनिक उत्तरदायित्व निश्चित होणे गरजेचे आहे. कारण पत्रकारिता जर सत्याऐवजी अफवांचे दलालपण करू लागली, तर समाजाचा चौथा स्तंभ राहणार नाही तो फक्त टीआरपीचा तमाशा बनेल.
लोकशाहीच्या बातमीचा व्हिडीओ ….
सकाळची बातमी ….
