रेल्वे पोलीसाला चोरी प्रकरणात आता अटक होणार

नांदेड(प्रतिनिधी)-अत्यंत लटकलेला रेल्वे पोलीसाच्या अटकेचा प्रश्न पहिले प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी 10 नोव्हेंबर रोजी निकाली काढला असून त्वरीत प्रभावाने रेल्वे पोलीसमध्ये कार्यरत असलेला आरोपी अक्षय जितेंद्र मोरचुले यास त्वरीत प्रभावाने न्यायालयासमक्ष हजर होण्यास सांगितले आहे. सोबतच या प्रकरणाच्या तपासीक अंमलदाराला अक्षय मोरचुलेला अटक करण्याचे स्वातंत्र्य ठेवले आहे.
दि.7 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर-नागपुर या रेल्वे गाडीत प्रवास करणारे प्रवासी गणेश राठी यांच्या पत्नीची बॅग चोरीला गेली. त्यामध्ये 14 लाख 1200 रुपयांचा ऐवज होता. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर रेल्वे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक हनुमंत पांचाळ यांनी अत्यंत जलदगतीने दखल घेतली. तेंव्हा कोल्हापुर-नागपुर ही गाडी पुर्णा रेल्वे स्थानकावर थांबली असतांना त्या ठिकाणी त्यांचाच पोलीस अक्षय मोरचुले बकल नंबर 441 हा रेल्वेमध्ये चोरी करण्यासाठी ख्यातनाम असलेल्या बाळू गणपत गव्हाणे सोबत रेल्वे स्थानकात गणवेश घालून फिरत होता. पोलीस अक्षय मोरचुलेेच चोर असलेल्या बाळू गव्हाणेसाठी वातानुकूलीत कक्षाचे दार उघडले हे दिसत होते. खरे तर अक्षय मोरचुलेची नोकरी धम्म परिषद नागपूर येथे लावण्यात आली होती. परंतू तो तेथे गेलाच नाही आणि इकडे चोराला मदत करत होता.
गुन्हा दाखल होताच रेल्वे पोलीसांनी चोर बाळू गणपत गव्हाणे याला अटक केली. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी दिली होती. या दरम्यान त्याने गणेश राठी यांच्या पत्नीच्या बॅगमध्ये असलेल्या ऐवजापैकी 7 लाख 52 हजार 984 रुपयांचा ऐवज पोलीसांना काढून दिला होता. त्यानंतर रेल्वे पोलीसांनी पोलीस अक्षय मोरचुलेेला अटक केली. त्याच्या घराची घरझडती घेण्यासाठी गेले असतांना त्यांच्या पोलीस असलेल्या पत्नीने घराला कुलूप लावून गेली होती. त्या प्रकरणातील तपासीक अंमलदार सहाय्यक पोलीस निरिक्षक अनिलकुमार जोगदंड यांनी अक्षय जितेंद्र मोरचुलेेच्या पत्नीला फोन केला तरी पण त्या आल्या नाहीत. त्यामुळे घर झडती अर्धवट राहिली.
त्यानंतर पोलीसांनी चोर बाळू गव्हाणे आणि अक्षय मोरचुलेे एकदाच न्यायालयासमक्ष हजर केले. बाळू गव्हाणेची पोलीस कोठडी संपली होती. म्हणून न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठविले. पण पोलीस कर्मचारी अक्षय पोरचुरेला पोलीस कोठडी मंजुर केली नाही तर त्याला नोटीस दिली. अर्थात जामीन दिला. याविरुध्द सहाय्यक पोलीस निरिक्षक अनिकुमार जोगदंड यांनी पुर्नविचार करावा असा अर्ज सादर केला. कारण या गुन्ह्यातील अजून बराच ऐवज जप्त करणे शिल्लक होते. यावर सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान गणेश राठी यांच्यावतीने ऍड. डी.के.हंडे यांनी सादरीकरण केले. त्यांनी सांगितले की, अक्षय मोरचुलेची पोलीस कोठडी मिळाल्याशिवाय चोरीमधील उर्वरीत ऐवज मिळणार नाही. सोबतच अजूनही बरेच काही गुन्हे जे लपलेले आहेत. ते उघड होतील. या सुनावणी दरम्यान अक्षय पोरचुरेच्यावतीने औरंगाबादहून एक वकील साहेब आले होते. त्यांनी सुनावणीनंतर गणेश राठी यांना सांगितले की, सामोपचाराने हे प्रकरण मिटवून टाकू.
आता न्यायालयाने अक्षय पोरचुरेला दिलेला जामीन रद्द केला आहे. सोबतच त्याला त्वरीत प्रभावाने न्यायालयात हजर होण्यास सांगितले आहे. तसेच तपासीक अंमलदार सहाय्यक पोलीस निरिक्षक अनिलकुमार जोगदंड यांना अक्षय मोरचुलेला अटक करण्याचे स्वातंत्र्य सुध्दा दिले आहे. पण या प्रकरणात अक्षय पोरचुरेला अटक झाली तर खऱ्या अर्थाने तपासीक अंमलदार कार्य करू शकतील काय? कारण अक्षय पोरचुरे आणि तपासीक अंमलदार सहाय्यक पोलीस निरिक्षक अनिलकुमार जोगदंड हे एकाच पोलीस ठाण्यात काम करतात. सोबतच बरेच काही इतर काम सोबत करतात. म्हणून या प्रकरणाचा तपास दुसऱ्या पोलीस ठाण्यातील एखाद्या अधिकाऱ्याकडे देणे जास्त छान होईल. या प्रकरणात सरकारी वकील एड. दयानंद गीते यांनी बाजू मांडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!