काही महिन्यापूर्वी मी देहदानाचा निर्णय घेतला व मुंबईच्या केईएम रुग्णालयात जाऊन त्याची औपचारिक प्रक्रिया पूर्ण केली. समाजातील मृत्यूविषयक अंधश्रद्धा, रूढी आणि गैरसमज दूर करण्यासाठी, मृत्यूनंतर शरीर वैद्यकीय शिक्षण व संशोधनासाठी उपयोगी पडावे, तसेच विज्ञाननिष्ठ, विवेकवादी आणि मानवतावादी विचारांचा प्रसार व्हावा तसेच समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा, हा या निर्णयामागील हेतू होता. मृत्यूनंतरही समाजाच्या उपयोगी पडावे आणि इतरांनाही देहदान व अवयवदानासाठी प्रेरणा मिळावी, या भावनेतून मी देहदान करण्याचा निर्णय घेतला. माझ्या सारखी बरीच व्यक्ती देहदान करतात परंतु अलीकडेच घडलेल्या सेजल पवार प्रकरणाने काही अस्वस्थ करणारे प्रश्न उपस्थित केले.
मुंबईतील प्रतिष्ठित केईएम रुग्णालयातील एमबीबीएस विद्यार्थिनी सेजल पवार हिने ‘प्रणित मोरे शो’ या स्टँड-अप कॉमेडी कार्यक्रमात, शरीरदान केलेल्या मृतदेहांविषयी—विशेषतः पुरुष मृतदेहांच्या जननेंद्रियाच्या आकारावरून—अत्यंत किळसवाणे, अश्लील आणि असंवेदनशील विनोद केले. तिने आणि तिच्या सहकाऱ्यांनी अभ्यासादरम्यान मृतदेहांच्या खासगी अवयवांची थट्टा केल्याचे आणि प्रक्रियेच्या शेवटी ते अवयव कापून काढल्याचे हसत-हसत सांगितले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर क्षणार्धात व्हायरल झाला आणि वैद्यकीय क्षेत्रासह संवेदनशील समाजघटकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली. त्याही पूर्वीच्या एका व्हीडिओत ती केईएम हॉस्पिटलला ‘चिंधी’, सोबतच्या लोकांना ‘कुरूप’ आणि शिक्षकांना ‘विषारी’ म्हणते.
या घटनेने वैद्यकीय शिक्षण आणि व्यवसायाच्या पायाभूत नैतिकतेवरच घाव घातला. ज्या देहाकडे ‘गुरू’ म्हणून पाहिले जाते, ज्याच्याप्रती कॅडॅव्हरिक ओथ घेऊन कृतज्ञता व्यक्त केली जाते, त्या देहाची अशी जाहीर हेटाळणी करणे ही केवळ असंवेदनशीलता नव्हे, तर मानवतेच्या मुळावरचा आघात होता. डॉ. आशा कदम यांनी योग्यच म्हटले आहे की, त्यांच्या काळात डिसेक्शन हॉलमध्ये फॉर्मेलिनच्या तीव्र वासातही त्या देहाविषयी करुणा दाटून येत असे. त्या म्हणतात, “विद्यार्थ्यांना शिकता यावे म्हणून कोणी देहदान केले असेल का, हा प्रश्न पडायचा. त्या देहावर अमानवी विचार करणे तर सोडाच, पण तसा विचारही कधी कोणाकडून ऐकला नाही.” हा संस्कारांचा भाग आहे. जो समाज ३७० रुपयांची बिर्याणी उकरून खाणाऱ्याची नोकरी गेल्याचे समर्थन करतो, तो समाज एका महिला डॉक्टरने मृतदेहांवर काढलेल्या अश्लील उद्गारांकडे सुरुवातीला दुर्लक्ष कसा करतो? या दुटप्पीपणाकडे त्यांनी बोट दाखवले. अनेकांनी सोशल मिडीयावर तिखट प्रतिक्रिया दिल्या की, तिच्यासारख्या नीच मानसिकता असणाऱ्या लोकांना धडा बसला पाहिजे. आणि ज्या शोमध्ये हे चालले, तो शो करणाऱ्या प्रणित मोरेवर कारवाई झाली पाहिजे.
या वादाने ‘डार्क कॉमेडी’ आणि ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ या नावाखाली होणाऱ्या अतिरेकाचाही कळस गाठला. केरळच्या डेंटिस्ट डाफ्नी क्लेयर यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये या मुद्द्याचा अत्यंत परखड समाचार घेतला. त्यांनी स्पष्ट केले की, मृतदेहाच्या खासगी अवयवांवर हसणे ही ‘डार्क कॉमेडी’ नाही. ‘डार्क कॉमेडी’चा उगम हा पीडितांनी स्वतःच्या दुःखावर विनोद करून त्यातून सावरण्याच्या प्रयत्नातून झाला. पण जो अनुभव तुम्ही स्वतः घेतलेला नाही, त्या दुसऱ्याच्या शरीराची किंवा अवयवांची चेष्टा करून तिला ‘डार्क कॉमेडी’ म्हणण्याचा नैतिक अधिकार कोणालाच नाही. हा मानवी प्रतिष्ठेचा भंग आहे. डॉ. क्लेयर यांनी पुढे एक खोल सामाजिक विसंगती अधोरेखित केली. त्या म्हणतात, “जेव्हा सेजलचा व्हिडिओ पहिल्यांदा समोर आला, तेव्हा पुरुषांनीच तिला फॉलो केले, हसले आणि प्रसिद्धी मिळवून दिली. त्यांनी तिचे फॉलोअर्स वाढवले. पण जेव्हा ३७० बिर्याणीवाल्याचे प्रकरण बाहेर आले—जे एका स्त्रीवरील लैंगिक अत्याचाराचे उदात्तीकरण होते—तेव्हा महिलांनी तात्काळ एकजुटीने निषेधाचा आवाज उठवला. याचा अर्थ, पुरुषांचा अपमान झाला की स्त्रिया पुढे येतात, पण स्त्रियांचा अपमान झाला (किंवा पुरुष देहदात्यांचा) की पुरुष हसतात आणि ‘फॉलो’ करतात, विशेषतः ती स्त्री दिसायला आकर्षक असेल तर!” या निरीक्षणामुळे हा वाद केवळ एका विद्यार्थिनीच्या बेजबाबदार वक्तव्यापुरता न राहता, समाजाच्या सामूहिक नैतिक बैठकीवर प्रश्न उपस्थित करणारा ठरला. दोन्ही प्रकरणे निंदनीय आहेत—एक मृत्यूनंतरची क्रूरता आणि अनादर, तर दुसरे जिवंत स्त्रीविरुद्धच्या लैंगिक हिंसेचे उत्सवीकरण. दोघांनाही जबाबदार धरले गेले पाहिजे, पण दोन्ही प्रकरणे एकसमान गुन्हे नाहीत.
सेजल पवार प्रकरणाने आणखी एक बाब अधोरेखित केली—केवळ वैद्यकीय पदवी मिळवल्याने माणुसकी, संवेदनशीलता किंवा नैतिकता आपोआप येत नाही. ज्या कोट्यवधी स्त्रियांना शिक्षणाची संधीही मिळत नाही, तिथे ही संधी मिळालेल्या एका विद्यार्थिनीने तिचा असा दुरुपयोग करावा, ही केवळ शोकांतिका आहे. सुदैवाने, केईएम प्रशासनाने चौकशी करून तिला सक्तीच्या रजेवर पाठवले आणि समुपदेशनाची शिफारस केली; तिने जाहीर माफीही मागितली. परंतु, या घटनेने वैद्यकीय शिक्षणात नैतिक मूल्ये, संवादकौशल्य आणि करुणेचे शिक्षण अधिक बळकट करण्याची नितांत गरज निर्माण केली आहे.
मानवी जीवनाची खरी किंमत ही केवळ त्याच्या कालावधीत नसून, त्या जीवनाने इतरांसाठी काय केले यात दडलेली असते. हे विधान आपण पिढ्यानपिढ्या ऐकत आलो आहोत. पण याचा सर्वांत सखोल अर्थ लक्षात येतो तो शरीरदानाची संकल्पना समजून घेतल्यावर. मृत्यू हे एक निर्विवाद, अटळ सत्य आहे. प्रत्येकाला एक ना एक दिवस हे भौतिक शरीर सोडावेच लागते. मातीत मिसळून जाणे, राख होणे किंवा पाण्यात विलीन होणे या नेहमीच्या पर्यायांपलीकडे जाऊन, आपला देह हा भविष्यातील ज्ञानाचा आधारस्तंभ बनू शकतो, ही जाणीवच मुळात थक्क करणारी आहे.
शरीरदान म्हणजे एखाद्या व्यक्तीने आपल्या मृत्यूनंतर आपला संपूर्ण देह वैद्यकीय शिक्षण, शस्त्रक्रिया कौशल्य विकास आणि वैज्ञानिक संशोधन यांसारख्या उदात्त हेतूंसाठी कायदेशीररीत्या दान करणे. ही निव्वळ एक वैद्यकीय प्रक्रिया किंवा कायदेशीर बांधिलकी नाही; हे तर मानवतेसाठी दिलेले अत्यंत मौल्यवान आणि निःस्वार्थी योगदान आहे. समाजात अनेकदा अवयवदानाबद्दल चर्चा होते, मात्र शरीरदानाचे अनन्यसाधारण महत्त्व तितकेसे अधोरेखित होत नाही. एका व्यक्तीने केलेले शरीरदान थेटपणे शेकडो डॉक्टरांना प्रशिक्षित करण्यात आणि त्यांच्यामार्फत हजारो रुग्णांचे प्राण वाचवण्यात कारणीभूत ठरते. हे दान म्हणजे मृत्यूनंतरही समाजासाठी ज्ञान, सेवा आणि मानवतेची ज्योत अखंड प्रज्वलित ठेवण्याचे विलक्षण सामर्थ्य बाळगून आहे.
शरीरदानाची संकल्पना समजून घेताना सर्वप्रथम ती अवयवदानापासून वेगळी करणे आवश्यक आहे. अवयवदानामध्ये, एखादी व्यक्ती ‘मेंदू-मृत’ (ब्रेन-स्टेम डेड) झाल्यानंतर तिचे हृदय, यकृत, मूत्रपिंड, डोळे, त्वचा असे जीवनदायी अवयव अन्य गरजू रुग्णांना प्रत्यारोपणासाठी दिले जातात. याउलट, शरीरदानामध्ये संपूर्ण देह हा वैद्यकीय महाविद्यालये, शासकीय रुग्णालये किंवा मान्यताप्राप्त संशोधन संस्थांना शरीररचनाशास्त्र (अॅनाटॉमी) शिकण्यासाठी, शल्यचिकित्सकांच्या सरावासाठी आणि नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी उपलब्ध करून दिला जातो. हे दान केवळ एका अवयवापुरते मर्यादित न राहता, संपूर्ण शरीर हे भविष्यातील वैद्यकीय तज्ज्ञांना घडवणारे पहिले आणि सर्वांत महत्त्वाचे पाठ्यपुस्तक बनते. भारतासारख्या विशाल देशात शरीरदान हे ‘अॅनाटॉमी अॅक्ट’ आणि संबंधित राज्यांच्या विशिष्ट नियमांनुसार नियंत्रित केले जाते. महाराष्ट्रात ‘महाराष्ट्र अॅनाटॉमी अॅक्ट, १९४९’ या कायद्यांतर्गत शरीरदानाला पूर्ण कायदेशीर मान्यता आहे. कोणतीही सज्ञान आणि सुस्थितीतील व्यक्ती आपल्या हयातीत इच्छापत्रात नोंद करून किंवा संबंधित संस्थेकडे अधिकृत नमुन्यात अर्ज करून हा संकल्प करू शकते. कायदेशीरदृष्ट्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी ही इच्छा पूर्ण करणे बंधनकारक असले, तरी सामाजिक संवेदनशीलता आणि कुटुंबाची सहमती ही अत्यंत महत्त्वाची असते. म्हणूनच, आपला हा निर्णय कुटुंबीयांना विश्वासात घेऊन, त्यांच्या भावना समजावून, त्यांची संपूर्ण संमती घेऊनच केलेला असावा, हे तितकेच आवश्यक आहे.
वैद्यकीय शिक्षणाचा पाया हा मानवी शरीररचनेच्या अत्यंत बारकाईच्या आणि सखोल आकलनावर उभा असतो. हृदयाचे कप्पे, फुफ्फुसांची पोकळी, स्नायूंचे आकुंचन-प्रसरण, रक्तवाहिन्या आणि मज्जातंतूंचे अदृश्य जाळे— या सर्वांची गुंतागुंतीची मांडणी केवळ पुस्तकातील सपाट आकृत्या, डिजिटल स्क्रीनवरील प्रतिमा किंवा व्हिडिओ पाहून समजून घेणे केवळ अशक्य आहे. यासाठी प्रत्यक्ष मानवी देहावर शवविच्छेदन (डिसेक्शन) करण्याचा अनुभव हाच खरा शिक्षक ठरतो. शरीरदानातून मिळालेला हा देह, ज्याला वैद्यकीय परिभाषेत ‘कॅडॅव्हर’ म्हटले जाते, तो विद्यार्थ्यांसाठी एका त्रिमितीय, जिवंत पाठ्यपुस्तकाप्रमाणे असतो. याच कारणामुळे जगभरातील नामांकित वैद्यकीय संस्थांमध्ये शरीरदात्यांना ‘पहिले शिक्षक’ (First Teacher) किंवा ‘सायलेंट मेंटॉर’ (Silent Mentor) या अत्यंत आदरयुक्त संज्ञांनी संबोधले जाते. हा देह बोलत नसला, तरी त्याच्या शांततेतून तो विद्यार्थ्यांना मानवी शरीराचे प्रत्येक गुपित उलगडून दाखवतो. एक नवोदित डॉक्टर जेव्हा आपल्या कारकिर्दीची सुरुवात करतो, तेव्हा मानवी शरीराशी त्याचा पहिला प्रत्यक्ष संवाद नेमका याच दान केलेल्या देहामुळे घडतो. ज्या हातांनी भविष्यात असंख्य रुग्णांवर गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करायच्या असतात, त्या हातांना सुरक्षित सरावाचे पहिले व्यासपीठ हा देहच उपलब्ध करून देतो. याचा अर्थ, एका शरीरदात्याच्या देहावर प्रशिक्षण घेऊन तयार झालेला एकच शल्यचिकित्सक आपल्या संपूर्ण आयुष्यात हजारो जीव वाचवू शकतो. हीच तर या दानाची अफाट ताकद आहे. मात्र, दुर्दैवाने भारतात शरीरदानाचे प्रमाण गरजेच्या तुलनेत अत्यल्प आहे. आदर्शतः दहा विद्यार्थ्यांमागे किमान एक देह उपलब्ध असावा अशी अपेक्षा असताना, प्रत्यक्षात ३० ते ४० किंवा काही ठिकाणी तर ७५ विद्यार्थ्यांना एका देहावर अवलंबून राहावे लागते. याचा विपरीत परिणाम वैद्यकीय शिक्षणाच्या प्रात्यक्षिक गुणवत्तेवर होतो. विद्यार्थ्यांना स्टूलवर उभे राहून दुरून पाहावे लागते, हाताचा सराव मिळत नाही आणि पुस्तकी ज्ञानावरच भिस्त ठेवावी लागते. या उणीवेची तीव्रता लक्षात घेता, समाजात शरीरदानाची जनजागृती निर्माण करणे ही नितांत गरज आहे.
शरीरदानाचा निर्णय घेताना कुटुंबीयांच्या मनात एक साहजिक, रास्त प्रश्न असतो—”मृत्यूनंतर आमच्या प्रिय व्यक्तीच्या देहाची प्रतिष्ठा आणि सन्मान राखला जाईल ना?” ही चिंता पूर्णपणे मानवी आणि स्वाभाविक आहे. मात्र, मान्यताप्राप्त वैद्यकीय संस्थांमध्ये या देहाशी अत्यंत आदराने, पवित्रतेने आणि संवेदनशीलतेने वागले जाते. हा केवळ तोंडी आश्वासनाचा भाग नसून, कडक नियमावली आणि वैद्यकीय आचारसंहितेचा तो गाभा आहे. देह प्राप्त झाल्यापासून ते अभ्यास पूर्ण होईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर त्याची प्रतिष्ठा राखली जाते. संस्थेत आल्यावर देहाला एक नोंदणी क्रमांक दिला जातो, जेणेकरून दात्याची वैयक्तिक ओळख पूर्णपणे गोपनीय राहते. विद्यार्थ्यांना दात्याचे नाव, गाव किंवा कुटुंब याची कोणतीही माहिती दिली जात नाही. देह जतन करण्यासाठी फॉर्मेलिनसारखी रसायने (एम्बॅल्मिंग) वापरून तो सुस्थितीत ठेवला जातो. अभ्यासाव्यतिरिक्त कोणत्याही कारणासाठी देहाचा वापर करण्यास कायद्याने सक्त मनाई आहे. थट्टा-मस्करी, छेडछाड किंवा प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल असे कोणतेही कृत्य करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई होते. आजकाल जवळपास सर्वच वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अभ्यास सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांकडून ‘कॅडॅव्हरिक ओथ’ (Cadaveric Oath) ही शपथ दिली जाते. या शपथेत विद्यार्थी देहदात्याला आपले गुरूस्थान देतात, त्यांच्या उदात्त त्यागाबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करतात आणि देहाला केवळ ज्ञानप्राप्तीचे पवित्र साधन मानून आदरपूर्वक वागण्याचे वचन देतात. याशिवाय, अनेक संस्था दरवर्षी शरीरदात्यांच्या कुटुंबांना आमंत्रित करून ‘कृतज्ञता सोहळा’ आयोजित करतात, जिथे संचालक, प्राध्यापक आणि विद्यार्थी एकत्र येऊन या दात्यांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतात. शरीरदानाची सामाजिक गरज आणि योगदान यांचे दूरगामी पैलू समजून घेतले पाहिजेत. हे योगदान केवळ विद्यार्थ्यांपुरते मर्यादित नाही. गुंतागुंतीच्या न्यूरोसर्जरी, कार्डियाक सर्जरी, ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया यांची नवीन तंत्रे आधी शरीरदान केलेल्या देहांवर प्रयोग करूनच परिपूर्ण केली जातात. नव्याने विकसित होणारी वैद्यकीय उपकरणे—जसे की स्टेंट, पेसमेकर, कृत्रिम सांधे—यांची सुरक्षितता चाचणी ही मानवी देहावर केली जाते. न्यायवैद्यक शास्त्राच्या (फॉरेन्सिक मेडिसिन) विद्यार्थ्यांना देहाच्या विघटन प्रक्रिया, जखमांचे स्वरूप यांचे शिक्षणही अशा देहांवरच होते. एखाद्या दुर्मिळ आजाराने मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे शरीर दान केले गेल्यास, त्या रोगाचे स्वरूप खोलवर समजून घेऊन उपचार शोधण्याची दिशा मिळते.
पर्यावरणपूरक दृष्टिकोनही यात दडलेला आहे. एका मृतदेहाच्या दहनासाठी सरासरी एक मोठा वृक्ष जाळला जातो आणि धुराचे प्रचंड प्रदूषण होते. शरीरदानामुळे हे पर्यावरणीय नुकसान टाळले जाते. मात्र, या सर्व ज्ञान आणि योगदानाच्या प्रवासात एक मोठा अडथळा म्हणजे सामाजिक अंधश्रद्धा आणि गैरसमज. “मृत्यूनंतर शरीर अबाधित राहिले पाहिजे, नाहीतर आत्म्याला मुक्ती मिळत नाही,” “देह कापला तर पुढच्या जन्मी विकलांगता येते,” अशा रूढ समजुती समाजात खोलवर रुजलेल्या आहेत. परंतु, कोणताही धर्म मानवसेवेला विरोध करत नाही; हिंदू, मुस्लिम, शीख, बौद्ध, जैन सर्वच धर्मांमध्ये परोपकार हाच सर्वोच्च धर्म मानला गेला आहे. शरीरदान हे तर अंतिम परोपकाराचे कृत्य आहे. या अडथळ्यांवर मात करण्यासाठी शाळा-महाविद्यालयांतून जनजागृती, सोशल मीडियाचा सकारात्मक वापर, शिबिरे आणि यशस्वी देहदात्यांच्या कुटुंबांचे अनुभव कथन यांची नितांत आवश्यकता आहे. शरीरदान म्हणजे ‘देहदान’ नव्हे, तर ते ‘ज्ञानदान’ आहे, ही भावना समाजमनावर बिंबवली पाहिजे.
या सगळ्या विवादाच्या पार्श्वभूमीवर, देहदान चळवळीतील प्रेरणादायी कार्य आणि व्यक्तिरेखा यांच्याकडे लक्ष वेधणे अधिक महत्त्वाचे ठरते. मुंबईत ‘ज्येष्ठ स्थानिक नागरिक सेवा मंच’ आणि समाजसेविका सविता घरत गेल्या १५ वर्षांपासून अविश्रांतपणे ही चळवळ चालवत आहेत. त्यांच्या कार्याचे ब्रीदवाक्य आहे—”मरावे परी कीर्ती रूपे उरवे, का नाही मरावे परी देहदान, अवयवदान रूपी उरावे.” सविता घरत, रश्मी परब आणि त्यांच्या सहकारिणी घरोघरी जाऊन, शिबिरे भरवून, ऑनलाइन मार्गदर्शन करून लोकांमधील भीती आणि अडथळे दूर करत आहेत. नुकतेच त्यांनी ९२ वर्षीय श्री. आर. के. सहगल यांची भेट घेतली. सहगल साहेब, जे स्वतः अभियंता असून मेलबर्न विद्यापीठाचे पदवीधर आहेत, ते गेली दोन वर्षे संस्थेच्या प्रतीक्षेत होते. त्यांची ९० वर्षांची पत्नी आणि ते मुलं परदेशात असूनही स्वतःच्या इच्छेने भारतात राहतात. त्यांच्या लहान मुलाला न्यू जर्सीहून खास बोलावून, सर्व कायदेशीर बाबींवर चर्चा करून, सविता घरत यांनी त्यांचा देहदान आणि अवयवदानाचा मार्ग सुकर केला. सहगल साहेबांचे ते वाक्य मनाला भिडते—”आयुष्यभर प्रामाणिकपणे जगलो, सगळं चांगलंच झालं. पण आता शेवटच्या क्षणीही मला समाजाला काहीतरी देऊनच जायचं आहे. त्यात कोणतेही विघ्न येऊ नये म्हणून आधीच ही तजवीज प्रत्येकाने केली पाहिजे.” अशी माणसे म्हणजे चालती-बोलती प्रेरणास्रोत आहेत. त्याचप्रमाणे, १९८८ पासून कार्यरत असलेल्या डोंबिवलीच्या ‘महर्षी दधीचि देहदान मंडळा’चे कार्यही अविस्मरणीय आहे. गुरुदासजी तांबे यांनी एका व्याख्यानाने प्रभावित होऊन मित्रांच्या मदतीने ही संस्था स्थापन केली. ही संस्था देहदानासोबतच नेत्रदान, त्वचादान, रक्तदान आणि अवयवदान यांचाही विनामूल्य प्रचार करते. त्वचा दान केल्यास भाजलेल्या रुग्णांवर त्वचारोपण करता येते; नेत्रदानाने चार ते सहा अंध व्यक्तींना दृष्टी मिळू शकते—या साऱ्या माहितीचा ते अविरत प्रसार करत आहेत.
या चळवळीचा खरा आत्मा समजून घ्यायचा असेल, तर प्रत्यक्ष कार्यकर्त्यांचे अनुभव ऐकावे लागतील. परभणीचे विनोद डावरे, ज्यांनी २०१५ साली आपल्या नानांचे (वडिलांचे) देहदान केले, ते सांगतात, “माझा एक डॉक्टर मित्र ३५ वर्षांनी भेटला आणि म्हणाला, ‘तुझ्या वडिलांच्या देहदानामुळेच मी आज हा डॉक्टर आहे. आमची इमारत फक्त त्या देहावर विसंबून आहे. आम्ही त्या देहासोबत गप्पा मारतो, एक नातं तयार होतं. आणि सगळं शिक्षण झाल्यावर अत्यंत हायजेनिक पद्धतीने आम्ही त्यांचा अंत्यविधी करतो.'” हे ऐकून त्यांच्या मनावरचे सारे दडपण उतरले आणि ते स्वतः या क्षेत्रात सक्रिय झाले. आजवर त्यांनी आपल्या वैयक्तिक प्रयत्नांतून १४ देहदाने आणि ३ अवयवदाने घडवून आणली आहेत—याचा त्यांना शून्य आर्थिक लाभ आहे, पण सामाजिक बांधिलकी म्हणून ते हे कार्य करत आहेत. ते विचारतात, “एका शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये ७५ विद्यार्थी एका देहाभोवती स्टूलवर उभे राहून शरीरशास्त्र शिकत आहेत. उद्या हेच विद्यार्थी तुमच्यावर उपचार करणार असतील, तर या शिक्षणाची गुणवत्ता काय असेल?” हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच विचार करायला लावणारा आहे. म्हणूनच, शरीरदान हा केवळ एक पर्याय नसून, ती काळाची गरज आहे. खुद्द एका डॉक्टर मित्राने एका देहदात्याच्या कुटुंबीयाला सांगितले होते, “आम्हा डॉक्टरांना जगात आई-वडिलांनंतर सर्वांत सन्माननीय व्यक्ती म्हणून वाटत असेल तर तो फक्त हा देहदाताच आहे. आमची संपूर्ण वैद्यकीय इमारत या देहावरच उभी आहे. आम्ही शवविच्छेदन करता-करता लंचब्रेकमध्ये हात धुऊन जेवतो आणि लगेच पुन्हा त्याच देहाशी एका आपुलकीच्या नात्याने जोडले जातो. इतके की आम्ही त्या देहाशी गप्पाही मारतो.” वैद्यकीय अभ्यास संपल्यानंतर त्या देहाच्या अवशेषांची कोणत्याही टाकाऊ वस्तूप्रमाणे विल्हेवाट न लावता, अत्यंत सन्मानपूर्वक, धार्मिक परंपरेनुसार किंवा कुटुंबीयांच्या इच्छेनुसार अंत्यसंस्कार केले जातात. काही संस्था अस्थी कुटुंबीयांना परत करतात, तर काही सामूहिक विसर्जन करतात. या सर्व प्रक्रियेत पारदर्शकता आणि आदर हा अढळ नियम आहे. डॉ. आशा कदम यांनी आपल्या अनुभवातून सांगितले की, “आजही पोस्टमॉर्टेम करताना त्या देहाची पुरेपूर काळजी आम्ही डॉक्टर व शिपाई लोक घेतो. मृतदेहाची डिग्निटी राखलीच पाहिजे हा अलिखित नियम सगळे पाळतात.” ही सन्मानाची परंपरा हजारो वर्षांपासून भारतीय संस्कृतीत रुजलेली आहे; महर्षी दधीचि यांनी तिन्ही लोकांच्या शांततेसाठी स्वतःची अस्थी दान केली आणि ते सृष्टीतील पहिले देहदाता म्हणून ओळखले जातात.
या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे समोर येते—शरीरदान ही चळवळ केवळ मृतदेहाच्या उपयोजनापुरती मर्यादित नाही. ती मानवी जीवनाचे श्रेष्ठत्व, परोपकाराची परमावधी आणि ज्ञानदानाची अखंड परंपरा यांचे मूर्त स्वरूप आहे. डॉ. आनंदीबाई जोशी, डॉ. द्वारकानाथ कोटणीस, डॉ. किशोर शांताबाई काळे, डॉ. नीतू मांडके, डॉ. रवी बापट, डॉ. प्रकाश-मंदा आमटे, डॉ. तात्याराव लहाने अशा कितीतरी वैद्यकीय दिग्गजांची मांदियाळी महाराष्ट्राने पाहिली आहे, ज्यांनी आपले आयुष्य मानवसेवेसाठी वेचले. हीच ती डॉक्टरांची खरी परंपरा. एका गॅरेजमधील मेकॅनिक सकाळी आपल्या अवजारांना नमस्कार करतो, व्यापारी चोपडीची पूजा करतो—ही आपल्या व्यवसायाप्रती कृतज्ञता असते. तशीच भावना एका आदर्श डॉक्टरची त्याच्या रुग्णांप्रती आणि शिक्षणाचे साधन बनलेल्या शरीरदात्याप्रती असायला हवी. अंजली झरकर यांनी म्हटल्याप्रमाणे, “जो धडधाकट माणूस डॉक्टरकडे जाणारच नाही; ज्याच्या शरीरात प्रॉब्लेम आहे तोच जातो, कारण त्याच्यासाठी डॉक्टर हा देव असतो. अशा जिवंत किंवा मृत शरीराची विटंबना करणाऱ्या नीच डॉक्टरांमुळे, एका कसायाच्या आणि डॉक्टरच्या मानसिकतेत काय फरक राहतो?” हा सवाल समाजाने गांभीर्याने घेण्याची वेळ आली आहे.
‘पॉप्युलर सायन्स’ मध्ये लिहिणाऱ्या ब्रूक बोरेल आपल्या एका लिखाणात लिहितात – परदेशात विज्ञान, सुरक्षा आणि शिक्षण आणि संशोधनात मृतदेहांचा उपयोग केला जातो. संशोधनाच्या अनेक क्षेत्रांसाठी मृतदेहांची आवश्यकता असते. उदाहरणार्थ, दुखापतीच्या बायोमेकॅनिक्सचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ मानवी शरीराला कसे दुखापत होते हे समजून घेऊ इच्छितात. यामुळे ते दुखापतींना प्रतिबंध करण्यास मदत करू शकतात. यासाठी, ते मृतदेह किती आघात सहन करू शकतो हे समजून घेण्यासाठी नियंत्रित चाचण्या आयोजित करतात. या चाचण्यांमधून मिळालेली मोजमापे एका मॉडेल किंवा डमीवर लागू केल्यानंतर, शास्त्रज्ञ आपल्याला सुरक्षित ठेवणाऱ्या संरक्षक गियरची (उदा. हेल्मेट, सीट बेल्ट) चाचणी आणि परिपूर्णता तपासतात.
अस्सल शरीराचा वापर कारमधील सीट बेल्ट किंवा ट्रेनमधील आसन अधिक सुरक्षित करण्यास मदत करू शकते. मेंदू अशी हेल्मेट्स डिझाइन करण्यास मदत करू शकतो ज्यामुळे अमेरिकन फुटबॉल खेळाडूंना कठोर टॅकलमध्ये होणाऱ्या मेंदूच्या आघातजन्य दुखापती कमी होतील. तसेच, सैनिकाला बॉम्ब स्फोटाच्या धक्क्यामुळे होणारी दुखापत कमी करण्यासाठीही याचा उपयोग होऊ शकतो. जेव्हा हे संशोधन पूर्ण होते, तेव्हा कुटुंबाला इच्छा असल्यास, माझे दाह केलेले अवशेष घेता येतात. अन्यथा, दान दात्याला इतर दावा न केलेल्या दात्यांसोबत एका स्मारक फलकाद्वारे, झाडाद्वारे किंवा गंभीर वार्षिक समारंभाद्वारे सन्मानित केले जाऊ शकते.

फोरेन्सिक शास्त्रज्ञ देखील त्यांच्या कामात मृतदेह वापरतात. काही विद्यापीठे दान केलेली शरीरे घेतात आणि त्यांना जमिनीत रोवतात किंवा एका निर्जन जंगलात ठेवतात. मग शास्त्रज्ञ वेळ मोजतात की माशा, डर्मेस्टिड बीटल्स आणि इतर कचरा खाणारे कीटक शरीरांना हाडे करण्यासाठी किती वेळ लागतो. हा एक प्रकारचा भिन्न पुनर्जन्म आहे – एका शेताच्या किंवा जंगलाच्या परिसंस्थेचा भाग बनणे. हा अंत भयावह वाटू शकतो, परंतु या प्रक्रियेतून मिळालेला डेटा फोरेन्सिक संशोधकांना एखादी व्यक्ती कधी मरण पावली आणि त्यांना कोणत्या दुखापती झाल्या असाव्यात हे ओळखण्यास मदत करतो. यामुळे कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना खुनाची प्रकरणे सोडवण्यास मदत होते.
अशा प्रक्रियेत शरीर एखाद्या विशिष्ट गुन्ह्याच्या उदाहरणार्थ – जंगलात टांगलेले, किंवा कारच्या ट्रंकमध्ये भरलेले वगैरे दृश्याची पुनर्निर्मिती करण्यासाठी वापरले जाऊ शकते. यामुळे प्रकरण सोडवण्यास किंवा एखाद्या पोलिसाला खुनीला न्यायाच्या कक्षेत आणण्यास मदत होऊ शकते. नंतर, सांगाडा फोरेन्सिक संग्रहात एका बॉक्समध्ये विश्रांती घेऊ शकतो, अधूनमधून हाडांच्या वृद्धत्वावरील संशोधनाच्या रूपात जिवंत राहू शकतो.
परंतु संपूर्ण शरीरदानासाठी आणखी एक पर्याय आहे, जो वैद्यकीय प्रशिक्षणातील एक प्रदीर्घ परंपरा आहे आणि माझ्यासाठी अधिक योग्य वाटतो. प्रत्येक पहिल्या वर्षाच्या वैद्यकीय विद्यार्थ्याला ‘ग्रॉस एनाटॉमी’ नावाचा अभ्यासक्रम घ्यावा लागतो, ज्यामध्ये ते मानवी मृतदेहाचे विच्छेदन करतात. हा त्यांचा पहिला रुग्ण असतो. कदाचित हा त्यांनी कधीही पाहिलेला किंवा स्पर्श केलेला पहिला मृतदेह असू शकतो. जेव्हा ते ग्रॉस एनाटॉमी खोलीत प्रवेश करतात, तेव्हा त्यांना वेगवेगळे मृतदेह दिसतात – ज्यापैकी प्रत्येक मानवी आकार चकित करणाऱ्या विविधतेचे उदाहरण असते. वैद्यकीय विद्यार्थी आणि त्यांचा पहिला मृतदेह यांच्यातील संबंध विशेष असतो. मृतदेह विद्यार्थ्याला अन्यथा मिळू न शकणारे ज्ञान प्रदान करतो; विद्यार्थी या देणगीबद्दल आश्चर्यचकित आणि कृतज्ञ असतो. असे डॉक्टर्स मानतात.
शरीर भविष्यातील डॉक्टरांना स्पाइनल टॅप घालण्यासाठी किंवा अपेंडिसाइटिस वगळण्यासाठी आवश्यक शारीरिक चिन्हे शिकवू शकते. एका शल्यचिकित्सकाला माझ्या हातातील नाजूक नसा विच्छेदन करायला शिकता येईल. किंवा, कदाचित, एका पॅथॉलॉजिस्टला मृत्यूपूर्वीची आणि मृत्यूनंतरची रक्त गुठळी यातील फरक जाणवू शकेल.

रिल्स आणि सोशल मीडियाच्या या युगात, क्षणिक प्रसिद्धीसाठी नैतिकतेचा बळी देण्याची मानसिकता वाढीस लागली आहे. डॉ. आशा कदम यांची ही भीती खरी आहे की, “रिलच्या नादात आपली पुढची पिढी काही चुकीचं-बेजबाबदार तर बोलत नाही ना, पाहत नाही ना, किंवा फॉलो तर करत नाही ना, हे पाहण्याची जबाबदारी आपलीच आहे.” या पार्श्वभूमीवर, शरीरदानाचा संकल्प करणे म्हणजे केवळ एका व्यक्तीचा निर्णय नसून, तो एक सामाजिक विधान आहे—की आपण ज्ञानाला, सेवेला आणि मानवतेला सर्वोच्च स्थान देतो. “मरावे परी कीर्ती रूपे उरावे” या उक्तीला खऱ्या अर्थाने सार्थ करणारी ही चळवळ आहे. मृत्यू हा जीवनाचा शेवट नसून, शरीरदानाद्वारे तो एका नव्या, अखंड सेवेचा आणि ज्ञानप्रवाहाचा आरंभबिंदू ठरतो. लोक त्यांच्या मृत्यूने जिवंतांना मदत करू शकतात. अनास्था, आळस, अज्ञान आणि अंधश्रद्धा यांची मानसिक होळी करून, आपण सर्वांनी या ज्ञानदानाच्या पवित्र वाटेवर पाऊल ठेवायला हवे. कारण, आपले शरीर हे मातीत मिसळून जाण्यापेक्षा किंवा राख होण्यापेक्षा, कोणाच्या तरी ज्ञानाचा प्रकाश बनले, तर त्यापेक्षा श्रेष्ठ कार्य दुसरे ते कोणतेच असू शकत नाही.
– कल्पना पांडे
(९०८२५७४३१५)
