नांदेड (प्रतिनिधी) – 14 एप्रिल 2026 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र शिवाजीनगर परिसरात फुले मार्केट ते शिवाजीनगर दरम्यानच्या रस्त्यावर पथदिवे (पोल लाईट) पूर्णपणे बंद असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. या प्रकारामुळे परिसरात अंधाराचे वातावरण निर्माण झाले होते.
या संदर्भात काँग्रेसचे नगरसेवक सत्यपाल सावंत यांनी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भीम जयंतीसारख्या महत्त्वाच्या दिवशी पथदिवे बंद राहणे ही अत्यंत गंभीर बाब असून यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले.
निवेदनानुसार, संबंधित भागात पूर्णतः अंधार असल्यामुळे कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. तसेच सुरक्षेच्याही दृष्टीने ही बाब धोकादायक ठरू शकली असती. विशेषतः भारताचे संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनीच अशा प्रकारची निष्काळजीपणा दिसून आल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नगरसेवक सत्यपाल सावंत यांनी या घटनेची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, या तक्रारीवर महानगरपालिकेकडून काय कारवाई केली जाते, याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

