नांदेड – शहरातील गुरुव्दारा प्रभाग क्र. १७ मधील मुख्य नाल्याची अत्यंत बिकट अवस्था समोर आली असून प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अबचलनगर, बडपुरा, शहीदपुरा, मुरमुरा भट्टी, बालाजी मंदिर ते रामघाट मार्गे गोदावरी नदीत मिळणारा हा महत्त्वाचा नाला सध्या पूर्णपणे कचरा, गाळ, विटा आणि दगडांनी तुंबलेला आहे.
माहितीनुसार, या नाल्याची शेवटची साफसफाई जून-जुलै २०२५ मध्ये करण्यात आली होती. मात्र त्यानंतर तब्बल ७-८ महिन्यांपासून कोणतीही साफसफाई करण्यात आलेली नाही. परिणामी नाल्याचा पाण्याचा प्रवाह थांबला असून जागोजागी घाण पाणी साचले आहे. यामुळे डासांचे प्रमाण प्रचंड वाढले असून मलेरिया, डेंगू सारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांकडूनही या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अमर सेवा आश्रमाचे अध्यक्ष अमरजीतसिंघ पंजाबसिंघ गिल यांनी महानगरपालिकेकडे निवेदन देत तात्काळ विशेष पथकाद्वारे पाहणी करून नाल्याची साफसफाई करण्याची मागणी केली आहे. तसेच दर महिन्याला नियमित साफसफाई करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आहे.
