श्रमदानातून जलसंधारणाच्या कामांना वेग
नांदेड- जिल्ह्यातील जलसंधारण बळकटीसाठी राबविण्यात येणाऱ्या जलतारा आणि वनराई बंधारा उपक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते किनवट तालुक्यातील थारा येथे ग्रामस्थांच्या श्रमदानातून करण्यात आला. जिल्ह्यासाठी निर्धारित एक लाख जलतारा निर्मितीच्या उद्दिष्टाला वेग देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी जेनितचंद्र दोन्तुल्ला, सहायक गटविकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत निमोड, नोडल अधिकारी चेतनकुमार जाधव, विस्तार अधिकारी कैलास गायकवाड, प्रादेशिक समन्वयक दिनेश खडसे, विविध विभागांचे अधिकारी तसेच ग्रामपंचायत प्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी जलतारा उपक्रम
‘Catch the Rain-Where it Falls, When it Falls’ या संकल्पनेनुसार पावसाचे वाहून जाणारे पाणी शेतातच मुरवून भूजलपातळी वाढविणे, जमीन चिभडण्याचे प्रमाण कमी करणे आणि जलसंधारण मजबूत करणे या उद्देशाने हा उपक्रम राबविला जात आहे.
मनरेगा विभाग व भारत रूरल लाइव्हलीहुड फाऊंडेशन (BRLF) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सहा तालुक्यांत हाय इम्पॅक्ट मेगा वॉटरशेड प्रकल्प (HIMWP) सुरू आहे. किनवट तालुक्यात हा प्रकल्प मनरेगासह राष्ट्रविकास ॲग्रो एज्युकेशन संस्था अमळनेर शाखा यांच्या माध्यमातून राबविला जात आहे. प्रकल्पातील ४३ गावांचे सविस्तर आराखडे पाणलोट क्षेत्राच्या माथा–पायथा तत्त्वानुसार तयार करण्यात आले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांचे श्रमदान व मार्गदर्शन
थारा येथील शेतकरी सदानंद साबळे यांच्या शेतात जिल्हाधिकाऱ्यांनी जलतारा खड्डा खोदण्याचे काम प्रत्यक्ष केले. तसेच गावातील नाल्यावर ग्रामस्थांसह वनराई बंधाऱ्याचे कामही श्रमदानातून पूर्ण करण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांनी जलताराच्या तांत्रिक बाबी स्पष्ट करताना सांगितले. पाच फूट रुंद व 5 फूट लांब, 6 फूट खोल आकाराच्या खड्ड्यात मोठे व मध्यम दगड भरून संरचना तयार करून खड्डा केला जातो. एका जलतारामधून अंदाजे 3.60 लाख लिटर पाणी जमिनीत मुरते. यामुळे शेतातील विहिरी व बोअरवेलचा पाणीसाठा वाढण्यास मदत होते. मनरेगा अंतर्गत अशा नैसर्गिक संसाधन संवर्धनाच्या कामांमुळे कुशल-अकुशल मजुरांना रोजगार उपलब्ध होतो असे त्यांनी सांगितले.
विविध शेती उपक्रमांना भेट
जिल्हाधिकारी कर्डिले यांनी एचआयएमडब्लुपी प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणाऱ्या शेती विषयक उपक्रमांची पाहणी केली. पिंपरफोडी येथील शेतकरी अभिजित जमादार यांच्या एकात्मिक शेवगा शेती प्रकल्पाला भेट दिली. बोधडी खुर्द येथील शेतकरी लक्ष्मीकांत मुंडे, नारायण मुंडे, तिरुपती फड यांच्या नैसर्गिक सेंद्रिय भाजीपाला, खजूर व चिकू फळबागांचे निरीक्षण केले. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून सेंद्रिय शेतीचा अवलंब करून पिकांवरील खर्च कमी करावा आणि निसर्ग संवर्धनाला हातभार लावावा, असे मार्गदर्शनही केले.
