नांदेड(प्रतिनिधी)-पवित्र रमजानच्या महिन्यातील 30 दिवसांसाठी रात्रीच्यावेळेत आस्थापना सुरू ठेवण्यासाठी वेगळे आदेश देण्याची आवश्यकता नाही असा उल्लेख करून महाराष्ट्राचे कामगार आयुक्त डॉ.एच.पी.तुम्मोड यांनी रमजान महिन्यामध्ये रात्री उशीरापर्यंत दुकाने सुरू ठेवता येतील. सोबतच दिवाळी, गणेश उत्सव, नाताळ या सणांच्या कालावधीत सुध्दा आस्थापना रात्री उशीरापर्यंत सुरू ठेवता येतील.
कामगार आयुक्त कार्यालयाने 27 फेबु्रवारी 2025 रोजी जारी केलेल्या एका पत्राप्रमाणे 1 मार्च 2025 ते 30 मार्च 2025 पर्यंत रमजान सणामध्ये रात्री उशीरापर्यंत दुकाने व आस्थापना सुरू ठेवण्याचा विषय आहे. जारी केलेल्या पत्रात दुकाने व आस्थापनांमधील कामगारांच्या सेवा शर्ती नियमित करण्याकरीता महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम 1948 हा राज्यात अधिसुचित स्थानिक क्षेत्रांमध्ये लागू आहे. या अधिनियमातील कलम 10, 11, 13, 19 आणि 26 मधील तरतुदीनुसार विशिष्ट वर्गवारीच्या आस्थापना उघडण्याच्या व बंद करण्याच्या वेळा निश्चित करण्यात आल्या होत्या. तथापी काही सणांच्या किंवा उत्सवांच्या प्रसंगी उदाहरणार्थ दिवाळी, गणेश उत्सव, रमजान ईद, नाताळ या कालावधी दुकाने व आस्थपना निर्धारीत वेळेपेक्षा अधिक वेळेत व्यवसायाकरीता सुरू ठेवण्यास शासनाकडून वेळोवेळी अधिसुचना निर्गमित करण्यात येत होती.
राज्य शासनाने महाराष्ट्र दुकाने व आस्थाना अधिनियम 1948 हा नियम निरस्त केला आहे. त्याऐवजी महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवा शर्तीचे विनियोजन) अधिनियम 2017 हा आता पारीत केला आहे. हा अधिनियम 19 डिसेंबर 2017 पासून अंमलात आलेला आहे. पुर्वीच्या अधिनियमाअंतर्गत दुकाने व आस्थापना उघडणे व बंद ठेवणे बंधनकारक नाही. तथापी नव्याने पारीत केलेल्या अधिनियमामध्ये दुकाने व आस्थापना व्यवसायीकास आवश्यक असल्यास तीन पाळ्यांमध्ये व्यवसाय सुरू ठेवण्यास मुभा आहे. मात्र सदर आस्थापनांमधील कामगारांना आठवड्यातून एक साप्ताहिक सुट्टी देणे आणि 8 तासांपेक्षा जास्त काम देवू नये हे बंधनकारक आहे. दरवर्षी प्रमाणे रमजान महिना, दिवाळी, नाताळ ईत्यादी सणांकरीता दुकाने व आस्थाना यांना व्यवसायाकरीता अधिक वेळ सुरू ठेवण्याबाबत अधिसुचना निर्गमित करण्यात येत होती. त्याची आता आवश्यकता नाही असे या पत्रात लिहिले आहे. म्हणजे रमजान महिन्यासोबत दिवाळी, नाताळ या सणांमध्ये सुध्दा रात्री उशीरापर्यंत दुकाने आणि आस्थापना सुरू ठेवता येतील.
रमजान महिन्यासह दिवाळी आणि नाताळ या सणांमध्ये सुध्दा रात्री उशीरापर्यंत व्यवसाय सुरू ठेवता येईल
