नांदेड (प्रतिनिधी)- पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआय (ISI) आता सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतातील, नांदेडमधील तरुणांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत आहे. या संदर्भात नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती पत्रकार परिषदेत दिली असून, तरुणांना आणि पालकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
देशाच्या सुरक्षेला धोका: ISI कडून तरुणांना पैशांचे आमिष मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमधील शहजाद भट्टी, राणा हुसेन, आबीद जट आणि इतर एक असे एकूण चार एजंट विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून भारतीय तरुणांशी संपर्क साधत आहेत. हे एजंट सुरुवातीला मैत्री करतात आणि त्यानंतर आपल्या परिसरातील महत्त्वाच्या व संवेदनशील ठिकाणांचे फोटो किंवा माहिती मागवतात. यासाठी ते तरुणांना थोड्या पैशांचे आमिष दाखवतात.
पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी स्पष्ट केले की, हे फोटो मागवण्यामागे शहरात काहीतरी अघटित घडवण्याचा कट असू शकतो. अशा प्रकारच्या कोणत्याही भूलथापांना तरुणांनी बळी पडू नये. जर असा कोणताही संशयास्पद कॉल किंवा मेसेज आला, तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, जेणेकरून तुमचे भविष्य उद्ध्वस्त होणार नाही. आयएसआयचे हे मॉड्यूल मोडून काढण्यासाठी तरुणांची सतर्कता अत्यंत आवश्यक आहे.
वाहतूक कोंडीवर कडक पाऊल: दोन मिनिटांच्या कामाचा विळखा राष्ट्रीय सुरक्षेसोबतच पोलीस अधीक्षकांनी नांदेड शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवरही चिंता व्यक्त केली आहे. शहरात अनेक ठिकाणी लोक फक्त दोन मिनिटांचे काम आहे असे सांगून आपली वाहने चुकीच्या पद्धतीने किंवा रस्त्यातच उभी करतात. यामुळे शहरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण होते.
आता या समस्येवर मात करण्यासाठी पोलीस अधीक्षक स्वतः आणि त्यांचे अधिकारी-कर्मचारी रस्त्यावर उतरून, पायी फिरून अशा शिस्तभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करत आहेत. आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही, अशा ठिकाणीच आपले वाहन उभे करा, असे आवाहन डॉ. नीलाभ रोहन यांनी केले आहे. जे नागरिक नियमांचे उल्लंघन करतील, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
