v धाराशिवमध्ये सर्वाधिक ११२ टक्के पाऊस
v छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यात पावसाची ओढ
v पेरणीयोग्य पावसाशिवाय पेरणीची घाई न करण्याचा विद्यापीठाचा सल्ला
लातूर – यंदाच्या पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मराठवाडा विभागात अतिशय संमिश्र चित्र पाहायला मिळत आहे. संपूर्ण छत्रपती संभाजीनगर विभागात जून महिन्यासाठी सरासरी ७१.५ मिमी पाऊस अपेक्षित असतो, मात्र प्रत्यक्षात केवळ ४०.७ मिमी (५६.९ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. संपूर्ण पावसाळी हंगामाच्या (जून ते सप्टेंबर) ६७९.५ मिमी सरासरीचा विचार करता, आतापर्यंत केवळ सहा टक्के पाऊस पडला आहे.
धाराशिव जिल्ह्याला पावसाचा सर्वाधिक दिलासा मिळाला आहे. धाराशिवमध्ये सरासरी ६७.७ मिमी पैकी ७६.३ मिमी (११२.७ टक्के) पाऊस बरसला आहे. बीड जिल्ह्यातही पावसाने चांगली हजेरी लावली. तिथे ६८.५ मिमी सरासरीच्या तुलनेत ५३.४ मिमी (७८ टक्के) पावसाची नोंद झाली. उर्वरित जिल्ह्यांमध्ये मात्र पाऊस मध्यम स्वरूपाचा आहे. लातूर जिल्ह्यात ४४.९ मिमी (६२.२ टक्के), नांदेडमध्ये ४९.० मिमी (५९.१ टक्के), हिंगोलीत ४३.८ मिमी (४८.६ टक्के) आणि परभणीत ३६.३ मिमी (४६.८ टक्के) पाऊस झाला आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन जिल्ह्यांत पावसाने मोठी दडी मारली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वात कमी म्हणजे अवघा १३.२ मिमी (१९.८ टक्के) आणि जालना जिल्ह्यात १९.२ मिमी (२७.२ टक्के) पाऊस झाला आहे.
हवामान अंदाज आणि इशारा
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईच्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवसांत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता आहे. १६ आणि १७ जून रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि नांदेड जिल्ह्यात सायंकाळी वादळी वाऱ्यासह हलका पाऊस होऊ शकतो.१८ व १९ जून रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता असून, पुढील ३ ते ४ दिवसांत कमाल तापमान २ अंश सेल्सिअसने वाढेल. मात्र, विस्तारित अंदाजानुसार १९ ते २५ जून दरम्यान मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे.
कृषी विद्यापीठाचा सल्ला
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीच्या तज्ज्ञ समितीने सध्याचा पाऊस हा पूर्व-मौसमी असल्याने शेतकऱ्यांना ७५ ते १०० मिमी पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई न करण्याचा सल्ला दिला आहे. कपाशीसाठी कोरडवाहू वा बागायती प्रकारानुसार वाण निवडावेत. कापूस पिकात तूर, सोयाबीन किंवा मूग, उडीद आंतरपीक पद्धती वापरावी. मर व करपा रोगाच्या नियंत्रणासाठी बियाण्यास सुडोमोनास फ्ल्युरोसन्स (१० ग्रॅम) किंवा कार्बेंडेझीम (३ ग्रॅम) प्रति किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. तुरीसाठी रायझोबियम, स्फुरद विरघळविणारे जिवाणू आणि ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया करावी. भुईमुगासाठी एसबी-११, जेएल-२४, एलजीएन-२ या वाणांचा वापर करून थायरमची बीजप्रक्रिया करावी. मक्याची अमेरिकन लष्करी अळीपासून संरक्षणासाठी सायॲन्ट्रानिलीप्रोल + थायामिथॉक्झाम (६ मिली प्रति किलो) बीजप्रक्रिया आवर्जून करून पीक व्यवस्थापन करावे.
तर केळी बागेत घड वाढीसाठी ००:५२:३४ (१५ ग्रॅम प्रति लिटर) फवारणी करावी. आंबा बागेत ढगाळ वातावरणामुळे पर्णगूच्छ रोग टाळण्यासाठी रोगनाशकाची फवारणी करावी. नवीन फळबाग लागवडीसाठी (केळी, आंबा, सीताफळ) रोपे केवळ शासकीय नोंदणीकृत रोपटिकेतूनच खरेदी करावीत. वादळी वाऱ्याचा अंदाज लक्षात घेऊन लहान वेलवर्गीय झाडांना काठीने आधार देऊन फळबाग, भाजीपालांचे व्यवस्थापन करावे. तसेच पशुधन व्यवस्थापन करताना अचानक झालेल्या वातावरणीय बदलामुळे जनावरांचा गोठा कोरडा व हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. दुभत्या जनावरांची कास पोटॅशियम परमॅग्नेटच्या पाण्याने धुवावी. पावसाळ्यात जनावरे उघड्यावर किंवा झाडाखाली बांधू नयेत, तसेच कोवळा व हिरवा चारा जास्त प्रमाणात देणे टाळावे, असाही कृषी विद्यापीठाने सल्ला दिला आहे.
