
या परीक्षा केंद्रावर सुमारे ४५० विद्यार्थ्यांनी न्यायालयाच्या लिपिक पदासाठी परीक्षा दिली. ऑनलाइन पद्धतीने परीक्षा सुरू असताना काही संगणक वारंवार हँग होत होते, तर काही संगणकांवरील माउस व्यवस्थित काम करत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. त्यामुळे प्रश्न सोडविताना वेळेचे नियोजन बिघडले आणि परीक्षेच्या कामगिरीवर त्याचा परिणाम झाल्याची भावना अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
विशेष म्हणजे, ऑनलाइन सराव परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी अनेक विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेत मात्र अपेक्षित कामगिरी करू शकले नसल्याचा दावा काही परीक्षार्थींनी केला आहे. त्यामुळे परीक्षा प्रक्रिया, तांत्रिक व्यवस्था आणि निकालाबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पडली का, असा सवालही परीक्षार्थी उपस्थित करीत आहेत.
परीक्षेपूर्वी केंद्रावरील संगणक प्रणाली, इंटरनेट व्यवस्था, माउस, की-बोर्ड आणि इतर तांत्रिक साधनांची पुरेशी तपासणी करण्यात आली होती का, याची चौकशी करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचा परीक्षेचा वेळ वाया गेला असल्यास त्याची अधिकृत नोंद घेण्यात आली का, तसेच अशा विद्यार्थ्यांना कोणती भरपाईची किंवा पुनर्परीक्षेची संधी दिली जाणार आहे, याबाबतही स्पष्टता आवश्यक असल्याचे परीक्षार्थी म्हणत आहेत.
दरम्यान, परीक्षा प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांमध्ये मोठी नाराजी असून संबंधित यंत्रणेने या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन संपूर्ण परीक्षा प्रक्रियेची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. भविष्यात न्यायालयाच्या लिपिक पदासह अशा महत्त्वाच्या ऑनलाइन परीक्षा घेताना सक्षम तांत्रिक यंत्रणा उपलब्ध करून देण्याबरोबरच परीक्षा प्रक्रिया थेट न्यायालयाच्या देखरेखीखाली आणि पूर्ण पारदर्शक पद्धतीने राबवावी, अशी मागणी परीक्षार्थींनी केली आहे.
विद्यार्थ्यांच्या आरोपांबाबत संबंधित परीक्षा यंत्रणा व परीक्षा केंद्र प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नसून, तक्रारींची चौकशी झाल्यानंतरच या आरोपांमागील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
