नायगाव येथे महाराजस्व अभियान’ उत्साहात; अभियानात दोन हजारांहून अधिक नागरिकांनी घेतला विविध योजनांचा लाभ
नांदेड – शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत नायगाव तहसील परिसरात दि. ८ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या शिबिरामध्ये विविध शासकीय विभागांच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडविण्यावर भर देण्यात आला. तालुक्यातील सुमारे एक हजार नागरिकांनी या अभियानात सहभाग नोंदवत विविध योजनांचा लाभ घेतला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी प्रशासनाची असल्याचे सांगितले. सामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयांच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत, त्यांच्या समस्या एकाच ठिकाणी तात्काळ सोडविल्या जाव्यात, हा या अभियानामागील मुख्य उद्देश आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लोकाभिमुख दृष्टीकोन ठेवून नागरिकांच्या अडचणी संवेदनशीलतेने सोडवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी व्यास पीठावर न बसता जिल्हाधिकारी राहुल कार्डिले सामान्य नागरिकांमध्ये खुर्ची टाकून बसले हे विशेष.
यावेळी तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांनी नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन केले. महसूल, पुरवठा, कृषी, आरोग्य, महिला व बालविकास, महावितरण, भूमी अभिलेख आदी विभागांनी उभारलेल्या स्टॉल्समुळे नागरिकांना विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.
या शिबिरात एकूण १२ विभागांचे स्वतंत्र स्टॉल्स उभारण्यात आले होते. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत प्रलंबित बँक केवायसी पूर्ण करून नवीन अर्ज स्वीकृत करण्यात आले. पुरवठा विभागामार्फत डिजिटल रेशन कार्डचे वाटप तसेच दुरुस्तीबाबत माहिती देण्यात आली. महसूल विभागाने नागरिकांना जिवंत व डिजिटल सातबाराचे विनामूल्य वितरण केले, तर रहिवासी, उत्पन्न व जातीच्या प्रमाणपत्रांसाठी नवीन अर्ज स्वीकारण्यात आले.
भूमी अभिलेख विभागामार्फत पी.आर. कार्ड, मोजणी प्रक्रिया व जमीन नोंदींबाबत नागरिकांना सविस्तर माहिती देण्यात आली. कृषी विभागाने पी.एम. किसान, महाडीबीटी, महाविस्तारख यांसारख्या योजनांची माहिती देत शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
आरोग्य विभागाकडून ‘आयुष्मान भारत’ आणि ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. महावितरण विभागाने ‘मागेल त्याला सोलर’ व ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना’ या सारखी माहिती दिली. महिला व बालविकास विभागामार्फत लेक लाडकी योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, बेबी केअर किट तसेच गरोदर मातांसाठी पोषण आहार योजनांची माहिती देण्यात आली. घरकुल योजना आणि वन विभागाच्या विविध योजनांबाबतही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात माहिती घेतली.
या प्रसंगी विविध योजनांतील लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. नागरिकांनी शासनाच्या विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रशासनाचे कौतुक करत समाधान व्यक्त केले. ग्रामीण भागातील नागरिकांना अशा शिबिरांमुळे मोठा दिलासा मिळत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
यावेळी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 अंतर्गत महिला शेतकरी श्रीमती आशाताई लक्ष्मण कदम रा. बाबुळगाव, महानंदा बापुराव तिजारे रा.पाटोदा यांना तुषार संच साठी पूर्व संमती पत्र देण्यात आले.
32 आयुष्मान गोल्डन कार्ड, 10 आयुष्मान वयवंदना कार्ड, 60 लाभार्थी मधुमेह व उच्च रक्तदाब स्क्रिनिंग तपासणी,३ क्षय रोगी रुग्णास फूड बास्केट चे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास नायब तहसीलदार विजय येरावाड, नगर पंचायतच्या मुख्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, विविध विभागांचे तालुकास्तरीय अधिकारी, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर डोईवाड यांनी केले.
