मतिमंद विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी ‘दिशा’ प्रकल्प प्रभावी – रूपाली कांबळे

जिल्हास्तरीय विशेष शिक्षक व मुख्याध्यापकांची बैठक संपन्न

नांदेड-जय वकील फाऊंडेशनच्या ‘दिशा’ प्रकल्पांतर्गत राज्यातील सर्व मतिमंद शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी समान सूत्र वापरले जात असल्याचे प्रतिपादन प्रकल्प समन्वयक रूपाली कांबळे यांनी केले आहे.
शहरातील मगनपुरा येथील आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात ‘दिशा अभियान’ अंतर्गत जिल्ह्यातील सर्व मतिमंद शाळांच्या मुख्याध्यापक व विशेष शिक्षकांची एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती.
या वेळी कार्यक्रमास डॉ. हंसराज वैद्य, एम. आर. जाधव, हर्षद शहा, स्टेट बँक ऑफ इंडिया चे मुख्य प्रबंधक राजीव कदम, ओमप्रकाश कोतापल्लीवार, अतुल हाळणे, दिव्यांग विभागाचे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता दिनकर नाठे, राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त छायाचित्रकार सचिन मोहिते, तसेच ‘दिशा’ प्रकल्पाचे साजिद मुल्ला व संघरत्न धूतराज आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्तृत्व करताना रूपाली कांबळे म्हणाल्या, “दिशा प्रकल्प हा मतिमंद मुलांच्या शैक्षणिक प्रगतीचा सातत्याने मागोवा घेण्यासाठी आहे. समान मूल्यमापन प्रणालीमुळे शिक्षकांना मुलांच्या सध्याच्या शैक्षणिक पातळीवर लक्ष ठेवता येते आणि गरजेनुसार योग्य दिशेने मार्गदर्शन करता येते.”
तसेच शाळांमध्ये शिक्षक बदल झाल्यास किंवा विद्यार्थी दुसऱ्या शाळेत गेल्यास, ही प्रणाली शिक्षकांना विद्यार्थ्यांची पूर्वस्थिती समजून घेण्यास मदत करते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात हर्षद शहा आणि एम. आर. जाधव यांनी नंदनवन प्रौढ मतिमंद कृषी कार्यशाळा या संस्थेमार्फत १८ वर्षे पूर्ण झालेल्या मतिमंद मुलांना विनामूल्य प्रवेश दिला जात असल्याची माहिती देत पालकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
एसबीआय बँकेचे राजीव कदम यांनी शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी आणि पालक एकत्र खाते उघडण्याचे महत्त्व स्पष्ट केले.या बैठकीस जिल्ह्यातील सर्व मतिमंद शाळांचे मुख्याध्यापक आणि विशेष शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!