बालविवाह प्रतिबंधासाठी जिल्ह्यात स्वाक्षरी मोहिमेस प्रारंभ

अक्षयतृतीयेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात जनजागृती कार्यक्रम

नांदेड :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी नांदेड जिल्ह्यात स्वाक्षरी मोहिमेची सुरुवात करण्यात आली. या मोहिमेचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर व जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या हस्ते संपन्न झाला.
या कार्यक्रमात महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, उपजिल्हाधिकारी पी. एस. बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रुपाली रंगारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे, गजानन जिदंमवार, बी.पी. बडवने, युनिसेफच्या मोनाली धुर्वे तसेच जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठानचे प्रकल्प समन्वयक अरुण कांबळे, निलेश कुलकर्णी, आशा सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांना बालविवाहाचे दुष्परिणाम समजावून देत, मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षितता याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासन, विविध स्वयंसेवी संस्था व युनिसेफ यांच्या संयुक्त पुढाकारातून ही मोहीम राबविण्यात येत आहे.
जिल्ह्यात नागरिकांनी बालविवाहास थारा देऊ नये आणि समाजात बालविवाहविरोधी संदेश पोहोचवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!