नांदेड (प्रतिनिधी)- येथील शक्तीनगर परिसरातील अक्वाटिक वॉटर ट्रीटमेंट या उद्योगाविरोधात दाखल करण्यात आलेल्या पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेच्या प्रकरणात न्यायालयाने दोन्ही आरोपींची मुक्तता केली आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय, नांदेडचे न्यायाधीश ए. जी. चव्हाण यांनी ५ जून २०२६ रोजी हा निकाल दिला.
अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी ३ मार्च २०१५ रोजी शक्तीनगर येथील उद्योगाची तपासणी करून ‘रिअल ऍक्वा या ब्रँडचे ६४ पाणी पाऊच नमुन्यासाठी जप्त केले होते. नमुने तपासणीसाठी पाठविल्यानंतर ते निर्धारित मानकांनुसार नसल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. तसेच संबंधित उद्योगाचा बीआयएस परवाना कालबाह्य झाल्याचाही उल्लेख तक्रारीत करण्यात आला होता.
या प्रकरणात दिलीप रतन जोंधळे आणि राजश्री दिलीप जोंधळे यांच्यावर अन्न सुरक्षा व मानके कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, सुनावणीदरम्यान पंच साक्षीदाराने फिर्यादीच्या कथनाला पाठिंबा दिला नाही. तसेच नमुने जप्तीची प्रक्रिया, नमुने प्रयोगशाळेकडे पाठविल्याचे पुरावे आणि काही महत्त्वाच्या कागदपत्रांची वैध सिद्धता करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचे न्यायालयाने नमूद केले.
पुराव्यातील त्रुटी व शंका लक्षात घेता सरकारी पक्ष आरोपींविरुद्धचा आरोप संशयाच्या पलीकडे सिद्ध करू शकला नसल्याचे न्यायालयाने निरीक्षण नोंदविले. त्यामुळे दोन्ही आरोपींना सर्व आरोपांतून मुक्त करण्यात आले.या खटल्यात आरोपी जोंधळे पती पत्नी कडून ऍड. सुमंत लाठकर यांनी काम पहिले.
