नांदेड, दि. ८ (प्रतिनिधी) – राज्य शिक्षण विभागाने आज दुपारी एक वाजता दहावी परीक्षेचा निकाल जाहीर केला असून नांदेड जिल्ह्याचा एकूण निकाल ८३.६२ टक्के लागला आहे.
यंदा दहावी परीक्षेसाठी जिल्ह्यातून एकूण ४८ हजार ६९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४७ हजार ३३३ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. यामध्ये १९ हजार ४१९ विद्यार्थी व २० हजार १६१ विद्यार्थिनी असे एकूण ३९ हजार ५८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्याच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८३.६२ इतकी नोंदविण्यात आली आहे.
लातूर विभागात नांदेड जिल्ह्याने तिसरे स्थान पटकावले आहे. तालुकानिहाय निकालात बिलोली तालुका ९२.२८ टक्क्यांसह अव्वल ठरला असून कंधार तालुक्याचा निकाल सर्वात कमी म्हणजे ६८.७७ टक्के लागला आहे. यंदाही मुलींनी उत्कृष्ट कामगिरी करत मुलांपेक्षा आघाडी कायम ठेवली असून मुलींची उत्तीर्णता ८८.७६ टक्के इतकी आहे.
जिल्ह्यातील तालुकानिहाय निकाल पुढीलप्रमाणे : नांदेड – ८९.५६ टक्के, अर्धापूर – ८९.९४, भोकर – ८३.०९, बिलोली – ९२.२८, देगलूर – ८२.७२, धर्माबाद – ८६.६९, हदगाव – ८४.५९, हिमायतनगर – ७९.४३, कंधार – ६८.७७, किनवट – ८१, लोहा – ७९.५५, माहूर – ७२.६४, मुखेड – ८७.३८, मुदखेड – ८३.१४, नायगाव – ७८.२८ आणि उमरी – ७६.३५ टक्के. जिल्ह्याचा एकूण निकाल ८३.६२ टक्के इतका लागल्याने विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.तरी मागील वर्षाच्या तुलनेत उत्तीर्ण संख्या टक्केवारी घसरली आहे.
