मुंबई (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने भारतीय पोलीस सेवा (IPS) व राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात महत्त्वाचा शासन आदेश जारी केला आहे. पोलीस आस्थापना मंडळ क्र. १ यांच्या शिफारशींचा विचार करून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील तरतुदीनुसार या बदल्या करण्यात आल्या आहेत.
जारी आदेशानुसार राज्यातील विविध जिल्ह्यांतील पोलीस अधीक्षक, उपआयुक्त तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. जालना येथील पोलीस अधीक्षक अजय के. बन्सल यांची सायबर सुरक्षा विभागात नियुक्ती करण्यात आली असून अमरावती (ग्रामीण) येथील सिंगुरी विशाल आनंद यांची धुळे येथे बदली करण्यात आली आहे. नाशिक (ग्रामीण) येथील बाळासाहेब पाटील यांची मुंबई शहरात पोलीस उपआयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांची राज्य गुप्तवार्ता विभागात बदली करण्यात आली असून ठाणे (ग्रामीण) येथील अधिकारी नितीन स्वामी यांची नाशिक (ग्रामीण) येथे नियुक्ती झाली आहे. वाशीम, नंदुरबार, चंद्रपूर, जालना आदी जिल्ह्यांतील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्याही या आदेशात करण्यात आल्या आहेत.
या बदल्यांनुसार पोलीस महासंचालकांनी संबंधित अधिकाऱ्यांची पदस्थापना करताना न्यायालयीन आदेश, निवडणूक आचारसंहिता तसेच कायदा व सुव्यवस्था यांचा विचार करून पुढील आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश शासनाने दिले आहेत.
हा शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून डिजिटल स्वाक्षरीने प्रमाणित करण्यात आला आहे. राज्यपालांच्या आदेशानुसार सहसचिव सुग्रीव धापटे यांनी हा आदेश निर्गमित केला आहे.
यासोबत बदली झालेल्या अधिकाऱ्यांची पीडीएफ संचिका जोडली आहे.
