छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित ‘शिवगर्जना’ महानाट्याचा नांदेड मध्ये प्रयोग

9,10,11 मार्चला नांदेड सर्कस ग्राउंडवर सायंकाळी दररोज सादरीकरण

नांदेड :-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाच्या ३५० व्या वर्षपूर्तीनिमित्त राज्य सरकारकडून राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवरायांवरील महानाट्याच्या प्रयोगाचे आयोजन केले जाणार आहे. दि. 9,10,11 मार्च 2024 रोजी,सर्कस ग्राउंड, रेल्वे स्टेशन शेजारी, नांदेड येथे आबालवृद्धाना विनामूल्य महानाट्य पाहता येणार आहे ,अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

 

राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागामार्फत आयोजित हे महानाट्य नांदेड जिल्ह्यामध्ये घेण्याबाबत राज्याचे ग्रामविकास पंचायत राज व पर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सूचना केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची माहिती जनसामान्यांना करून देण्यासाठी ३ प्रयोगांचे आयोजन एकाच ठिकाणी सलग तीन दिवस होणार आहेत. हे महानाट्य पाहण्यासाठी सर्वांसाठी मोफत प्रवेश असणार आहे. कोणत्याही पासेस विना प्रवेशिका विना प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे महाराष्ट्राच्या भूमीतील प्रत्येकाने बघावा असा हा नाटय प्रयोग सहकुटुंब बघण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्वांना सादर निमंत्रित केले आहे. किमान दहा हजार शिवप्रेमींसाठी या महानाट्याचे नियोजन केले जाणार आहे. यासाठी वाहनतळ, रस्ते मार्ग, आपत्ती व्यवस्थापन, बैठक सुविधा, जनजागृती आदि विषयांवर चर्चा व नियोजन करण्यात आले.

 

या महानाट्याला नांदेड जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन पालकमंत्री गिरीश महाजन आणि जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आवाहन केले आहे

 

*आशिया खंडातील सर्वात मोठे महानाट्य शिवगर्जना*

 

 

आजवर या महानाट्याने संपूर्ण भारतात हिंदी आणि मराठी अश्या दोन्ही भाषेत 85 प्रयोग यशस्वीरित्या सादर केले आहेत, भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या प्रमुख उपस्थितीतही हे महानाट्य सादर झाले आहे. या महानाट्यात 250 कलाकारांसह हत्ती, घोडे, उंट, बैलगाडी यांचा प्रत्यक्ष वापर होणार आहे. तर 140 फूट लांब आणि 60 फूट उंच असे भव्य दिव्य नेपथ्य असणार आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याला नेत्रदिपक आतिषबाजीही असणार आहे, तसेच लोकनृत्य आणि लोककलांची व्यवस्थित सांगड घातली आहे.

12व्या शतकापासून ते शिवजन्मापर्यंत आणि शिवजन्मापासून ते शिवराज्याभिषेका पर्यंत पूर्ण इतिहास मांडण्यात आला आहे.दररोज सायंकाळी साडेसहा वाजता प्रयोगाला सुरुवात होणार आहे.तरी सर्व नागरिकांनी या अविस्मरणीय क्षणाचा लाभ घ्यावा,असे अवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *