विद्यार्थी-पालकांनी प्रवेशापूर्वी मान्यता तपासण्याचे आवाहन
नांदेड (प्रतिनिधी) – विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेशी कोणतीही तडजोड होऊ नये, यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत २४ महाविद्यालयांमधील बी.एस्सी. प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. आवश्यक शैक्षणिक सुविधा, प्रयोगशाळा, पात्र प्राचार्य व प्राध्यापकांची अनुपलब्धता तसेच शैक्षणिक व प्रशासकीय अंकेक्षण (ट्रिपल ए) नियमांतील तरतुदीत त्रुटी आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
विद्यापीठाच्या शैक्षणिक (संलग्नीकरण) विभागाने याबाबतची माहिती प्रसिद्ध केली. विद्यापीठाच्या तपासणीत ५४ महाविद्यालयांमध्ये बी.एस्सी. अभ्यासक्रमासाठी आवश्यक प्रयोगशाळा उपलब्ध नसल्याचे, काही ठिकाणी पात्र अध्यापक व प्राचार्यांची नियुक्ती न झाल्याचे तसेच काही संस्थांनी ट्रिपल ए ऑनलाइन अंकेक्षणासाठी आवश्यक प्रस्ताव सादर न केल्याचे निदर्शनास आले.
ट्रिपल ए अंकेक्षणासाठी आवश्यक प्रस्ताव सादर न करणे, वेळोवेळी पाठपुरावा करूनही प्रयोगशाळा न उभारणे अशा महाविद्यालयांमधील बी.एस्सी. प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे, त्यामध्ये कै. ग्यानबाजी केशवे वरिष्ठ
महाविद्यालय, माहूर; महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, उस्माननगर; देविदासराव कल्याणकर महाविद्यालय, नांदेड; कै. बाबुराव इंगेवाड महाविद्यालय, वाघाळा; शिवशक्ती महाविद्यालय, काकांडी; दिगंबरराव भाऊराव पाटील महाविद्यालय, रामेश्वर; महात्मा
बसवेश्वर महाविद्यालय, मरखेल; राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय, नरसी; कृषीरत्न शरदचंद्रजी पवार महाविद्यालय, जवळाबाजार; राजर्षी शाहू महाविद्यालय, हिंगोली; आदर्श महिला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, हिंगोली; विठ्ठल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लोणी; संत तुकाराम महाविद्यालय, धानोरा; ज्ञानदीप कला व विज्ञान महाविद्यालय,
मरडसगाव; कै. सिताराम पाटील महाविद्यालय, सरकळी; बाळासाहेब ठाकरे वरिष्ठ महाविद्यालय, ताडकळस आणि ब्रिलियंट महिला वाणिज्य महाविद्यालय, लातूर या महाविद्यालयांचा समावेश आहे.
तसेच छत्रपती कला व विज्ञान महाविद्यालय, जवळाबाजार; बहिर्जी स्मारक वरिष्ठ महाविद्यालय, हट्टा; समाजप्रबोधनी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कनेरगाव; कौशल्य ज्ञानवर्धिनी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, गोरेगाव; शिवाजी महाविद्यालय, मुरूड; त्रिपुरा महाविद्यालय, लातूर आणि स्वामी विवेकानंद महाविद्यालय, लातूर या महाविद्यालयांबाबतही तपासणीसाठी प्रस्ताव व एफ ग्रेड प्राप्त झाल्याने त्यांच्या बी.एस्सी. प्रथम वर्ष प्रवेशावरही स्थगती घालण्यात आली आहे.
विद्यापीठाने संबंधित महाविद्यालयांना बी.एस्सी. प्रथम वर्षासाठी कोणत्याही विद्यार्थ्याला प्रवेश न देण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करून प्रवेश दिल्यास विद्यार्थ्यांचे पात्रता अर्ज, परीक्षा अर्ज, हॉलतिकीट किंवा निकालासंदर्भात कोणतेही शैक्षणिक नुकसान झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित महाविद्यालय प्रशासन व संस्थेवर राहील, असा स्पष्ट इशाराही विद्यापीठाने दिला आहे.
दरम्यान, विद्यार्थी आणि पालकांनी प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित महाविद्यालयाची विद्यापीठ मान्यता, आवश्यक प्रयोगशाळांची
उपलब्धता तसेच विद्यापीठाचे अधिकृत परिपत्रक तपासूनच प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन विद्यापीठाच्या शैक्षणिक संलग्नीकरण विभागाकडून करण्यात आले आहे.
