नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्हा पोलीस दलात सध्या खुर्च्यांचा खेळ रंगात आला असून, बदलीच्या वाऱ्याने पुन्हा एकदा धूळ उडवली आहे. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली, तर बिलोलीचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांना थेट स्थानिक गुन्हा शाखेच्या खुर्ची वर विराजमान करण्यात आले. अर्थात, खुर्ची बदलली की नशिबही बदलते, अशीच चर्चा पोलीस वर्तुळात रंगली आहे.
काही दिवसांपूर्वी नियंत्रण कक्षात विश्रांती वर पाठवले गेलेले अतुल भोसले अचानक पुन्हा सक्रिय झाले. म्हणे, कुणाच्यातरी अदृश्य आशीर्वादाने त्यांचे पुनरागमन झाले. त्यांच्या कार्यकाळात डीआयजी पथकाने तब्बल ३६ हायवा गाड्या आणि काही पोकलेन पकडून दिल्या होत्या; मात्र पुढे त्या प्रकरणाचे काय झाले, हा प्रश्न आजही हवेतच तरंगतो आहे. भोसले यांनी त्यावेळी तहसीलदारांच्या आदेशानुसार गाड्या सोडल्याचे सांगितले होते आणि प्रकरणही तेवढ्यापुरते शांत झाले.दरम्यान, बिलोली पोलीस ठाणे सध्या रिक्त पदाची अनुभूती घेत असल्याची चर्चा आहे. उदय खंडेराय यांच्यावर मात्र अन्याय झाल्याची भावना व्यक्त होत असून, काहींची मर्जी राखण्यात अपयश आल्यानेच बदली झाली असावी, अशी कुजबुज सुरू आहे. हिंगोलीपासून नांदेडपर्यंत चर्चेत राहिलेल्या खंडेरावय यांच्या जागी आता भोसले मैदानात उतरले आहेत. आता स्थानिक गुन्हा शाखा गुन्हे उघड करते की फक्त खुर्च्यांचेच रहस्य उलगडते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
