नांदेड (प्रतिनिधी)- आंबेडकरवादी लोकमंच नांदेड तर्फे भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ वा जयंती महोत्सव नांदेड शहरात येत्या रविवारी दि. २६ एप्रिल २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये सायंकाळी ४ वाजता शंकरराव चव्हाण सभागृहात धर्मनिरपेक्ष भारताचे भवितव्य या विषयावर मराठवाड्यातील जेष्ठ आंबेडकरवादी नेते मा. सुरेशदादा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली प्रबोधन महासभा आयोजित करण्यात आली आहे.या महासभेस नांदेड जिल्ह्याचे खा. रविंद्र चव्हाण तसेच लोहा कंधार तालुक्याचे आ. प्रतापरावजी पाटील चिखलीकर हे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या महासभेत राजधानी दिल्लीतील नामवंत पत्रकार अशोक वानखेडे, मुंबईतील डॉ. आंबेडकर लॉ कॉलेजचे माजी प्राचार्य, बहुजन समाज पार्टीचे मुंबई कोकण क्षेत्राचे प्रभारी ऍड. जयमंगल धनराज, मुंबई मराठी पत्रकार संघाचे कार्यकारीणी सदस्य जेष्ठ पत्रकार दिवाकरजी शेजवळ हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती आंबेडकरवादी लोकमंचचे महासचिव प्रा. देविदास मनोहरे आणि पी.एस. गवळे यांनी या पत्रकाव्दारे दिली आहे.
यंदाचे वर्ष हे महाडच्या चवदार तळ्याच्या समता संगराच्या शताब्दीचे आहे, तसेच महात्मा ज्योतीबा फुले यांच्या व्दिशताब्दीचे ही आहे त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवात यावर्षी दलित-बहुजन समाजात मोठा जोश आणि चैतन्य संचारले आहे असे आंबेडकरवादी लोकमंचचे संस्थापक अध्यक्ष सुरेशदादा गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. या पत्रकार परिषदेस आंबेडकरवादी लोकमंचचे जनार्दन कवडे, नंदकुमार बनसोडे, प्रसेनजीत गायकवाड, ऍड. एम.जी. बादलगांवकर, बबीताताई पोटफोडे, बाळु कदम, भगवान गायकवाड इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
