वाशीम (प्रतिनिधी)-दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वे संरक्षण दलाने (RPF) प्रवासी सुरक्षा आणि सार्वजनिक सेवेसाठी आपली सतर्कता व समर्पण पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. विविध रेल्वे स्थानकांवर करण्यात आलेल्या यशस्वी कारवायांमधून ही बाब अधोरेखित झाली आहे.
ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत वाशीम रेल्वे स्थानकावर घरातून पळून आलेल्या पाच अल्पवयीन मुलांची रेल्वे सुरक्षा बल (RPF) ने सुटका केली. रेल्वे सुरक्षा बल चे हेड कॉन्स्टेबल एस. एम. बालखंडे यांनी रेल्वेमध्ये फिरताना ही मुले घाबरलेल्या अवस्थेत आढळली. तात्काळ कारवाई करत RPF ने चाईल्ड हेल्पलाईन (1098) ला माहिती दिली व त्यांच्या पालकांचा शोध घेतला. जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी समुपदेशन व पडताळणी केल्यानंतर या मुलांना पुढील काळजी व पुनर्वसनासाठी चाईल्ड हेल्पलाईनकडे सुरक्षितपणे सुपूर्द करण्यात आले.
ऑपरेशन अमानत अंतर्गतही RPF कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणा आणि कार्यक्षमतेचे उत्तम उदाहरण दाखवले. नांदेड रेल्वे स्थानकावर हेड कॉन्स्टेबल एस. श्रीधर यांनी ट्रेन क्रमांक 11001 एक्सप्रेसमध्ये एका प्रवाशाने विसरलेले टायटन कंपनीचे स्टीलचे मनगटी घड्याळ शोधून काढले. सुमारे ₹8,000 किंमतीचे हे घड्याळ योग्य पडताळणीनंतर मालकाला परत करण्यात आले. त्याचप्रमाणे जालना रेल्वे स्थानकावर कॉन्स्टेबल संदीप जाधव यांनी एक बेवारस बॅग शोधून काढली. त्या बॅगमध्ये सॅमसंग मोबाईल फोन आणि औषधे होती. योग्य पडताळणीनंतर ती बॅग संबंधित प्रवाशाला परत देण्यात आली.

प्रवासी सुरक्षेला अधिक बळकटी देत ऑपरेशन यात्री सुरक्षा अंतर्गत RPF आणि सरकारी रेल्वे पोलिसांच्या संयुक्त पथकाने पूर्णा जंक्शन येथे एका सराईत गुन्हेगाराला अटक केली. हा आरोपी चोरी करण्याच्या प्रयत्नात असताना पकडण्यात आला. पुढील तपासात त्याचा संबंध ट्रेन क्रमांक 18504 एक्सप्रेसमधील एका प्रवाशाच्या सुमारे ₹2 लाख किमतीच्या वस्तू चोरी प्रकरणाशी असल्याचे निष्पन्न झाले. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला लोहमार्ग पोलीस (GRP) कडे सुपूर्द करण्यात आले आहे.
या सर्व कारवायांमधून रेल्वे सुरक्षा बल (RPF) कर्मचाऱ्यांची सतर्कता, प्रामाणिकता आणि मानवतावादी दृष्टिकोन स्पष्टपणे दिसून येतो. प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करणे, हरवलेल्या वस्तू शोधून परत देणे, तसेच असुरक्षित मुलांची सुटका करणे यामध्ये RPF सातत्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. या कारवायांमध्ये सहभागी RPF कर्मचाऱ्यांचे रेल्वे प्रशासनाने कौतुक केले आहे.
रेल्वे संरक्षण दल प्रवाशांसाठी सुरक्षित, संरक्षित आणि प्रवासी-अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी सतत कटिबद्ध आहे.
