नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील वाढत्या पाणी प्रदूषणामुळे गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणावर मासेमृत्यूची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांत नदीपात्रात लाखो मासे मृत अवस्थेत आढळून आल्याने पर्यावरणीय संतुलन बिघडल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून महापालिका प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, नाल्यांमधील सांडपाणी थेट गोदावरीत सोडले जात असल्याने पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण धोकादायकरीत्या घटले आहे. जलचरांना जगण्यासाठी आवश्यक असलेले किमान ८ टक्के विरघळलेला ऑक्सिजन (DO) उपलब्ध नसल्याने माशांचा श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्याचबरोबर पाण्यातील एकूण विरघळलेले घन (TDS) प्रमाणही मानक मर्यादेपेक्षा दुपटीने वाढून ६०० च्या पुढे गेल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारचे प्रदूषण हे दीर्घकाळ चाललेल्या दुर्लक्षाचे परिणाम असून यासाठी स्थानिक प्रशासन जबाबदार आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या (NGT) आदेशांनंतरही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) प्रभावीपणे कार्यान्वित न केल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. “जर हीच परिस्थिती कायम राहिली, तर भविष्यात नांदेडकरांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी मिळणे कठीण होईल,” असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. या घटनेमुळे गोदावरी नदीच्या अस्तित्वावरच प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करून प्रदूषण रोखावे, अशी जोरदार मागणी होत आहे.

