नांदेड – दरवर्षी १० जून हा दिवस जागतिक दृष्टिदान दिन म्हणून साजरा केला जाते. सुप्रसिद्ध नेत्रविशारद डॉ. आर. ए. भालचंद्र यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस दृष्टिदान दिन म्हणून पाळला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांना नेत्रदानाचे महत्त्व पटवून देणे आणि त्याविषयी समाजात जागृती निर्माण करणे हा आहे. या निमित्ताने बहाद्दरपुरा ता. कंधार येथील शांतीघाट हिंदू स्मशानभूमीत येथील सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने काव्य पौर्णिमा या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सप्तरंगी साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अनुरत्न वाघमारे, कार्याध्यक्ष प्रज्ञाधर ढवळे , ज्येष्ठ कवी थोरात बंधू, युवाकवी आकाश चव्हाण, राहुल वाढे, मंडळाचे तालुकाध्यक्ष कवी प्रकाश ढवळे नागलगांवकर, डी. एन. मोरे खैरकेकर, जलील लखेरे, रवी लाला, पत्रकार राजेश्वर कांबळे आदींची उपस्थिती होती.
आपल्या मरणानंतर आपण अवयवदान किंवा देहदान केले पाहिजे. किमान आपण नेत्र दान केले पाहिजेत. ज्यामुळे आपल्या नंतर कुणाला दृष्टी मिळाली तर ही सृष्टी पाहू शकेल, असे आवाहन सहभागी कवींनी केले. काव्यपौर्णिमा -१०६ या कविसंमेलनाच्या कार्यक्रमात जीवन आणि मृत्यू यांतील फरक सांगणाऱ्या तसेच अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या कविता सादर झाल्या. यात अनुरत्न वाघमारे, कार्याध्यक्ष प्रज्ञाधर ढवळे , ज्येष्ठ कवी थोरात बंधू, युवाकवी आकाश चव्हाण, राहुल वाडे, मंडळाचे तालुकाध्यक्ष कवी प्रकाश ढवळे नागलगांवकर, डी. एन. मोरे खैरकेकर यांनी सहभाग नोंदविला. यावेळी प्रकाश ढवळे नागलगांवकर यांचा वाढदिवस स्मशानभूमीत साजरा करण्यात आला. प्रास्ताविक काव्य पौर्णिमेचे संकल्पक प्रज्ञाधर ढवळे यांनी केले. सूत्रसंचालन अनुरत्न वाघमारे यांनी केले तर आभार प्रकाश ढवळे यांनी मानले.
