नांदेड – शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत एका नागरिकाच्या मालकीच्या भूखंडावर जबरदस्तीने ताबा घेतल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. संबंधित नागरिकाने पोलीस निरीक्षकांकडे लेखी तक्रार देत जीवाला धोका असल्याचीही भीती व्यक्त केली आहे.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, २१ एप्रिल रोजी दुपारी काही व्यक्ती एकत्र येऊन त्यांच्या मालकीच्या जागेवर आले व वाद घालत धमकावण्यास सुरुवात केली. संबंधितांनी भूखंडावर बेकायदेशीरपणे वाहन उभे करून ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. विरोध केल्यावर शिवीगाळ, दमदाटी तसेच मारहाणीची धमकी दिल्याचे शिरीष सिंह सुंदर सिंह तेहरा आणि स्मिता तेहरा यांच्या तक्रारीत नमूद आहे. बळजबरी ताबा मारण्याचा प्रयत्न करणाऱ्याची नावे सुद्धा तक्रारीत लिहिलेली आहेत.
संबंधित व्हिडीओ …..
या घटनेमुळे तक्रारदार व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, तक्रारदाराने पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर हा वाद सिव्हिल मॅटर असल्याचे सांगत पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, भूखंडावर जबरदस्ती ताबा घेण्याच्या प्रकारांमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असून अशा प्रकरणांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून तक्रारदाराला संरक्षण द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. तक्रार २१ एप्रिल रोजी दिल्यानंतर आज पर्यंत सुद्धा शिवाजीनगर पोलिसांनी काहीएक दखल घातलेली नाही. आज ही रात्रीतून ताबा मिळवण्याचा प्रकार सुरु आहे. ही जमीन कोट्यवधी रुपयांची आहे.सरकारी विश्रामगृहा समोरून जाणाऱ्या रत्यावर देवगिरी विश्रामगृहाच्या पाठीमागून ही वादातील जमीन सुरु होते.
मागे काही दिवसांपूर्वी याच महात्मा फुले पुतळा ते अण्णाभाऊ साठे पुतळा कडे जाणाऱ्या रस्त्यावरअश्याच एका भूखंडावर रात्री पोलिसांच्या समोर कब्जा मारण्यात आलेला आहे.त्या कब्जा प्रकारात ६०० ते ७०० मोदकांचा प्रसाद चढवला गेला होता अशी चर्चा झालेली आहे. तो भूखंड १० हजार ते २० हजार चौरस फुटांचा होता. आता सुरु असलेला नवीन ताबा प्रकारातील जमीन तर फारच मोठी आहे. यातील मोदक प्रसादांचा आकडा मात्र समजला नाही. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
संबंधित व्हिडीओ …..
