नांदेड(प्रतिनिधी)-सन 2024 ची लोकसभा निवडणुक नांदेड लोकसभा मतदार क्रमांक 16 मध्ये सुध्दा गाजलीच होती. कोण निवडुण येणार यावर पैजा लागल्या, एक्झीट पोल करण्यात आले. त्या सर्वांमध्ये विजयी माळ विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या गळ्यात पडणार असेच कल होते. देशात सुध्दा काहीसा असाच प्रकार होता. पण नांदेड लोकसभा मतदार संघात विजयी माळ वसंतराव चव्हाण यांच्या गळ्यात पडली आणि चव्हाणांनी मागच्या निवडणुकीचा बदला घेतला अशी चर्चा सुरू झाली.
16-लोकसभा नांदेडमध्ये 2019 च्या निवडणुकीमध्ये कॉंग्रेसचे उमेदवार अशोकराव चव्हाण यांचा पराभव करून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर हे जवळपास 43 हजार मताधिक्याने निवडुण आले होते. त्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा.यशपाल भिंगे यांनी 1 लाख 43 हजार मते प्राप्त केली होती. असे म्हणतात राजकारणामध्ये कोणी कायम मित्र नसतो आणि कोणी कायम शत्रु नसतो.त्याच पध्दतीने मागील पाच वर्षाच्या कालखंडात अनेक घडामोडी झाल्या. हे काम मी केले, त्यांना काय माहित, माझ्याकडे जीआर आहे अशा शब्दात प्रताप पाटील चिखलीकर यांनी विरोधकांवर टिका करत आपली खासदारकी चालवली. यापेक्षा भरपूर गोष्टी आहेत. परंतू त्या लिहिणे आजच्या घडीला उचीत नाही.
काही व्यक्तीगत कारणांनी अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आणि 48 तासात त्यांनी राज्यसभेची खासदारकी मिळवली. त्यानंतर आजची परिस्थिती पाहता त्यांनाही आपल्या निर्णयावर पश्चाताप नक्कीच होत असेल. भारतीय जनता पार्टीने मराठवाड्याच्या 9 लोकसभा मतदार संघातील निवडणुकांची जबाबदारी अशोक चव्हाण यांना दिली होती. त्यात नांदेड सुध्दा सहभागी होते. नांदेड लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून 95 हजार मताधिक्य घेवून कॉंगे्रसचे उमेदवार वसंत चव्हाण हे विजयी झाले आहेत. प्रताप पाटील चिखलीकर यांनी सन 2019 मध्ये 43 हजारांचे मताधिक्य घेवून विजय संपादीत केला होता.त्यापेक्षा दुपटीने जास्त मताधिक्य घेवून त्यांचा पराभव करण्यात चव्हाणांना यश आले आहे.
मी म्हणजे कॉंगे्रस असा अशोक चव्हाणांचा समज असेल तर त्यांनी कॉंगे्रस ही स्वतंत्र संस्था आहे. कॉंगे्रसमुळे तुम्ही हे नांदेडच्या निवडणुकीत जनतेने दाखवून दिले. लाखोंच्या फरकातून प्रताप पाटील चिखलीकर निवडुण येतील असा समज भारतीय जनता पार्टीच्या लोकांना होता. तो आत्मविश्र्वास चव्हाणांच्या विजयाने खोटा ठरला. या निवडणुकीच्या निकालाचे परिणाम काय होतील याचा अंदाज आज बांधता येणार नाही पण नक्कीच काही प्रतिक्रिया व्यक्त होतील आणि त्या जनतेसाठी मनोरंजनाच्या ठरतील असे म्हणायला हरकत नाही.
वास्तव न्युज लाईव्हच्यावतीने नांदेड लोकसभा मतदार संघातील प्रत्येक मतदाराला, प्रत्येक व्यक्तीला विनंती आहे की, निवडणुक संपली, निकाला लागला, एकच उमेदवार विजयी होणार असतो तो झाला. पण निकालाच्या कारणावरून प्रत्येक निवडणुकीनंतर दाखल होणारे गुन्हे यंदा होणार नाहीत याची दक्षता घ्या अशी विनंती आहे.
लोकसभा निवडणुकीत चव्हाणांचा बदला चव्हाणांनी घेतला
![](https://vastavnewslive.com/wp-content/uploads/2024/06/IMG_20240604_161922.jpg)