रिंदाच्या नावावर आठ कोटीची खंडणी मागणारा 12 तासात गजाआड

नांदेड(प्रतिनिधी)-रिंदा गॅंगसे बोल रहा हु असे सांगून आठ कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या गुन्हेगाराला दहशतवाद विरोधी पथकाने 12 तासात गजाआड केले आहे.
एका बांधकाम व्यवसायीकाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात काल दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा क्रमांक 99/2024 भारतीय दंड संहितेच्या कलम 384, 385, 386, 507 प्रमाणे दाखल झाला. खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार, पोलीस उपनिरिक्षक दशरथ आडे, गंगाप्रसाद दळवी, हरजिंदरसिंघ चावला, पोलीस अंमलदार राजू सिटीकर, दिपक ओढणे, राजू बोधगिरे, साहेबराव कदम, अनिल बिरादार, अशोक मस्के, शेख इजराईल आणि अकबर पठाण यांनी सायबर सेलच्या माध्यमातून बांधकाम व्यवसायीकाला आलेल्या व्हाटसऍप कॉलचे विश्लेषण करून तो मोबाईल ज्या माणसाच्या ताब्यात आहे त्याला ताब्यात घेतले. हा युवक नितीन सुर्यवंशी आहे. त्याने फेबु्रवारी महिन्यात एक जुना मोबाईल खरेदी केला होता. त्यावरचे व्हाटसऍप वापरुन त्याने बांधकाम व्यवसायीकाला फोन केला आणि मै रिंदा गॅंगसे बोल रहा हु असे म्हणून 8 कोटीच्या खंडणीची मागणी करतांना बचना है तो पैसे देना पडेगा असे सांगितले.
गुन्हा दाखल होताच 12 तासात खंडणी खोराला अटक करणाऱ्या पोलीस पथकाचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराय धरणे आदींनी कौतुक केले आहे. आजही रिंदाच्या नावावर खंडणी मागणारे नवनवीन युवक समोर येत आहेत.
शिवाजीनगर डी.बी.चे काम काय?
या प्रकरणातील फिर्यादी हा शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा आहे. त्यांच्या हद्दीत घडलेल्या घटनेला खंडणी विरोधी पथकाने पकडले. मग शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथक काय करत आहे असा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *