नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात गुरुवार (दि. 6 ऑगस्ट) सकाळी संपलेल्या 24 तासांत बहुतांश तालुक्यांत पावसाने विश्रांती घेतली. जिल्ह्यात आज केवळ 0.60 मि.मी. सरासरी पावसाची नोंद झाली. मात्र चालू हंगामात आतापर्यंत जिल्ह्यात 446.60 मि.मी. पाऊस झाला असून, तो या कालावधीतील सरासरी पर्जन्यमानाच्या 99.80 टक्के इतका आहे.
महसूल विभागाच्या दैनंदिन पर्जन्यमापन अहवालानुसार, आजच्या दिवसात देगलूर तालुक्यात सर्वाधिक 2.40 मि.मी., तर मुदखेड व कंधार येथे प्रत्येकी 1.50 मि.मी., माहूर येथे 1.30 मि.मी., बिलोली येथे 0.80 मि.मी., नायगाव येथे 0.30 मि.मी., लोहा येथे 0.20 मि.मी. आणि हदगाव येथे 0.10 मि.मी. पावसाची नोंद झाली. नांदेड, भोकर, किनवट, हिमायतनगर, धर्माबाद, उमरी, अर्धापूर व मुदखेडसह अनेक तालुक्यांत पावसाची नोंद शून्य राहिली.
जिल्ह्यातील एकूण पर्जन्यमानाचा विचार करता माहूर तालुक्यात 632.70 मि.मी. आणि किनवटमध्ये 623.40 मि.मी. पावसाची नोंद झाली असून हे तालुके आघाडीवर आहेत. तर नायगाव (348.40 मि.मी.) आणि बिलोली (358.40 मि.मी.) येथे तुलनेने कमी पाऊस झाला आहे.
चालू हंगामातील पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश भागात खरीप पिकांना दिलासा मिळाला असून, आगामी काही दिवसांत होणाऱ्या पावसाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. महसूल विभागाकडून तालुकानिहाय पर्जन्यमानावर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.

