नव्याचे नऊ दिवस न ठरता, आपल्या कामाचा ठसा उमटवण्यासाठी जिद्द आणि चिकाटी लागते, याचा प्रत्यय सध्या नांदेड जिल्ह्याला येत आहे. २४ जून रोजी नांदेड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदाची धुरा डॉ. नीलम रोहन यांनी आपल्या खांद्यावर घेतली. आज त्यांच्या कार्यकाळाला ४३ दिवस पूर्ण झाले असून, या अल्प कालावधीत त्यांनी नांदेडमध्ये कायद्याचे राज्य अधिक सुदृढ करण्यासाठी अत्यंत कठोर मेहनत घेतली आहे.
डॉ. नीलाभ रोहन यांचा अनुभव कमी आहे. पण जिद्द मोठी आहे. केंद्र सरकारच्या प्रतिनियुक्तीवर काम केल्यानंतर त्यांनी हिंगोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पद यशस्वीपणे भूषवले आणि त्यानंतर त्यांची नियुक्ती नांदेडसारख्या मोठ्या जिल्ह्यात झाली. जशी दृष्टी तशी सृष्टी या उक्तीप्रमाणे, नांदेड जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार आणि लोकसंख्येचे गांभीर्य ओळखून त्यांनी आपल्या कामाचे नियोजन केले आहे. नांदेडचा भौगोलिक आकार मोठा असून, येथील ३६ पोलीस ठाण्यांचा कारभार पाहणे हे मोठे आव्हान आहे.
एका मोठ्या लवाजम्याचे नेतृत्व करताना ऐकावे जनाचे, करावे मनाचे असे न वागता त्यांनी सर्वांना सोबत घेऊन चालण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यांच्या मदतीला २ अपर पोलीस अधीक्षक आणि अनेक पोलीस पोलीस उप अधीक्षक कार्यरत आहेत. जवळपास ३७०० पोलीस कर्मचारी आणि ५०० पोलीस अधिकारी अशा अवाढव्य फौजफाट्याचे नेतृत्व करताना, एका हाताने टाळी वाजत नाही हे ओळखून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांकडून कोणतीही चूक होऊ नये, याची प्रकर्षाने दखल घेतली आहे.
सध्या गुन्हेगारी विश्वात एक प्रकारची धडकी भरली आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. मात्र, भय इथले संपत नाही अशी स्थिती गुन्हेगारांची झाली असली तरी, सर्वसामान्य जनतेपर्यंत अद्याप पोलीस अधीक्षकांच्या कार्याची पूर्ण माहिती पोहोचलेली नाही. आजही अनेक सामान्य नागरिकांना आपल्या तक्रारी थेट अधीक्षकांपर्यंत कशा पोहोचवायच्या, हे समजत नाही. दिव्याखाली अंधार राहू नये यासाठी प्रशासनातील काही घटक जे आजही जुन्या वळणाने (मोदकांचे) काम करत आहेत, त्यांच्यावर डॉ. नीलाभ रोहन यांना कडक नजर ठेवावी लागणार आहे.
अधिकारी येतो आणि जातो, पण हाती ज्याच्या काठी, तोच म्हशीचा धनी या न्यायाने कायद्याची काठी जर योग्य दिशेने फिरली, तरच जनतेचा विश्वास वृद्धिंगत होतो. डॉ. नीलाभ रोहन यांनी नांदेड जिल्ह्यात आपली विहित मुदत पूर्ण करावी आणि आपल्या कर्तृत्वाचा ध्वज आभाळावर फडकवावा, हीच आजच्या त्यांच्या जन्मदिनी सदिच्छा. नांदेडच्या मातीत कामाचा नवा सुगंध दरवळू लागला असून, भविष्यात हा जिल्हा गुन्हेगारीमुक्त होण्याच्या दिशेने पावले टाकेल, अशी आशा निर्माण झाली आहे.त्यांची विहित मुदत संपल्या नंतर ते पुढच्या प्रवासाला जातील तेव्हा, धोया था हात उसने कभी नाव मी बैठकर मेहंदी कि खुशबू आज भी झील मे आती है असेच नांदेडकर म्हणतील असे आम्हाला वाटते.
