नांदेड (प्रतिनिधी)- मुखेड तालुक्यातील केसर येथील रहिवासी बालाजी मारोती कोंडामंगले यांनी आपल्या मुलगा व्यंकट बालाजी कोंडामंगले यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पोलिस उपनिरीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.पण तेथे जाऊन आल्या नंतर सुद्धा मुखेडचे पोलीस निरीक्षक काही कार्यवाही करत नाहीत. यालाच तर म्हणतात पोलीस खाते करील तेच होईल.
निवेदनानुसार, 4 मे 2026 रोजी व्यंकट बालाजी कोंडामंगले याचा मृतदेह गावाजवळील विहिरीच्या परिसरात आढळून आला होता. मृत्यूचे कारण पोहताना बुडाल्याने झाल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले असले, तरी मृताच्या पोटातील दोन्हीकडील फासळ्या तुटलेल्या असल्याचेही अहवालात नमूद असल्याचा दावा अर्जदाराने केला आहे. त्यामुळे मृत्यू नैसर्गिक नसून घातपाताचा संशय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अर्जात गावातील काही व्यक्तींवर संशय व्यक्त करण्यात आला असून, त्यांच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे. तसेच संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी यापूर्वी तक्रारींची दखल घेतली नसल्याचा आरोपही अर्जदाराने केला आहे.
व्यंकट कोंडामंगले यांच्या मृत्यूमागील सत्य समोर आणण्यासाठी प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच दोषींवर कठोर कारवाई करून कुटुंबाला न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.काल दिनांक ११ जून २०२६ रोजी कोंडामंगले यांना एफ आय आर फाडायचा आहे असे सांगून मुखेड पोलिसांनी बोलवून तर घेतले,पण एफआयआर फाडण्यात आला नाही. तेव्हा कोंडामंगले कुटुंबातील महिला आता मुखेड पोलीस ठाण्यासमोर बसून आहेत. तरी त्यांची दखल घेतली जात नाही. बहुदा म्हणूनच ही म्हण रूढ झाली असावी की पोलीस खाते करील तेच होईल.
दरम्यान, या प्रकरणाबाबत पोलिस प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. चौकशीनंतरच मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे सांगितले जात आहे.
