ईद-उल-अझहाच्या निमित्ताने आयोजित विशेष कार्यक्रमात प्रख्यात धर्मपंडित मुफ्ती खलील-उर-रहमान साहिब यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात त्यांनी हजरत इब्राहिम (स.अ.स.) आणि हजरत इस्माईल (स.अ.स.) यांच्या महान बलिदानाचा उल्लेख करत ईद-उल-अझहाचा खरा संदेश स्पष्ट केला. त्यांनी सांगितले की, हा सण केवळ धार्मिक परंपरा नसून त्याग, निःस्वार्थता, प्रेम, मानवता आणि सामाजिक बांधिलकी यांचे प्रतीक आहे. समाजातील गरीब, गरजू आणि दुर्बल घटकांची मदत करणे हीच खरी ईद असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी ईदची नमाज मौलाना साद अब्दुल्ला साहिब यांनी पठण केली. त्यानंतर मुहम्मद झुबैर फारुकी साहिब यांनी विशेष प्रवचन दिले. आपल्या प्रवचनात त्यांनी मुस्लिम उम्माच्या ऐक्यासाठी, देशातील शांतता, सुरक्षितता, बंधुत्व आणि सामाजिक सलोखा कायम राहावा यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले. देशाच्या प्रगतीसाठी आणि सर्व समाजघटकांमध्ये सौहार्द टिकून राहण्यासाठी विशेष दुआ करण्यात आली.
यानंतर मौलाना साद अब्दुल्ला साहिब यांच्या नेतृत्वाखाली सामूहिक प्रार्थना घेण्यात आली. या प्रार्थनेत देशाच्या सुरक्षिततेसाठी, समाजातील शांततेसाठी, नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षणासाठी तसेच सर्व नागरिकांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली. ईदगाहमध्ये उपस्थित हजारो मुस्लिम बांधवांनी अत्यंत श्रद्धेने आणि शिस्तबद्ध पद्धतीने नमाज अदा केली. नमाज पूर्ण झाल्यानंतर नागरिकांनी एकमेकांना मिठी मारून ईद-उल-अझहाच्या शुभेच्छा दिल्या. लहान मुले, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. अनेकांनी आपल्या नातेवाईक, मित्रपरिवार आणि समाजातील विविध घटकांशी भेटीगाठी घेत सणाचा आनंद साजरा केला. परिसरात सर्वत्र आनंद, प्रेम आणि बंधुत्वाचे वातावरण अनुभवायला मिळाले.
ईद-उल-अझहाच्या निमित्ताने अनेक मुस्लिम धर्मीयांनी कत्तलीसाठी जमा केलेल्या निधीतून गरीब आणि गरजू कुटुंबांना आर्थिक मदत तसेच अन्नधान्य वाटप केले. काही सामाजिक संस्थांनीही गरजूंना कपडे, अन्न आणि जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले. समाजातील दुर्बल घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचवण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. त्यामुळे या सणाला सामाजिक संवेदनशीलतेची जोड मिळाल्याचे दिसून आले. दरम्यान, ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकेने चोख व्यवस्था केली होती. ईदगाह परिसरात वाहतूक नियंत्रण, सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता आणि नागरिकांच्या सोयीसाठी विशेष नियोजन करण्यात आले होते. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सकाळपासूनच बंदोबस्तासाठी तैनात होते. त्यामुळे नमाज आणि नागरिकांच्या येण्या-जाण्यात कोणताही अडथळा निर्माण झाला नाही. एकूणच, नांदेड शहरात ईद-उल-अझहाचा सण धार्मिक श्रद्धा, सामाजिक ऐक्य, शांतता आणि आनंदाच्या वातावरणात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या सणातून मानवता, प्रेम, त्याग आणि बंधुत्वाचा संदेश समाजात अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
