अनुसूचित जाती-जमाती व दुर्बल घटकांसाठी 1 कोटी 56 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य, चारचाकी वाहन खरेदीसाठी अनुदान, विद्यार्थ्यांना लॅपटॉपसाठी मदत तसेच गर्भवती माता व बालकांच्या सुरक्षेसाठी अॅनोमली स्कॅनसाठी 40 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दिव्यांगांसाठीही 1 कोटी 16 लक्ष रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे. शेती क्षेत्रात ड्रोन खरेदीसाठी 12 लक्ष रुपये, जैविक कीटकनाशक प्रयोगशाळेसाठी 12 लक्ष, सूक्ष्म प्रक्रिया उद्योगांसाठी 16 लक्ष रुपये तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना 18 लक्ष रुपयांची मदत देण्यात येणार आहे. प्रिसीजन फार्मिंग योजनेसाठी 11 लक्ष रुपयांची तरतूद आहे. पशुधन विभागाकरिता 90 लक्ष रुपये तरतूद ठेवण्यात आली आहे. यामध्ये औषधी, ईमारत दुरुस्ती, लस वाहतुक याचा समावेश आहे. लघु पाटबंधारे विभागासाठी 45 लक्ष तरतूद करण्यात आली आहे.
महिला व बाल विकासासाठी 78 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली असून अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना गणवेश, ड्युअल डेस्क व भांडी पुरविणे तसेच घटस्फोटित व विधवा महिलांच्या पाल्यांना सहाय्य देण्यात येणार आहे. घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन तसेच प्लास्टिक प्रक्रिया प्रकल्पांसाठी 57 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पाणीपुरवठा विभागासाठी तब्बल 4 कोटी 65 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला गती देण्यासाठी 78 लक्ष रुपयांचा निधी देण्यात आला असून ग्रामविकासाला चालना मिळणार आहे. हा अर्थसंकल्प महिला सक्षमीकरण, आधुनिक शेती, दर्जेदार शिक्षण व सक्षम आरोग्य सेवा यावर आधारित असून ग्रामीण भागाच्या सर्वागीण विकासाला गती देणारा ठरणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे सर्व खाते प्रमुख व सर्व गट विकास अधिकारी यांची उपस्थिती होती.
मेघना कावली (आयएएस) यांनी आज अर्थसंकल्पाचे सादरीकरण करताना दाखवलेला आत्मविश्वास, परिश्रम आणि समर्पण भावनिकदृष्ट्या तसेच प्रशासकीय दृष्टीनेही अत्यंत उल्लेखनीय ठरला. या महत्त्वपूर्ण प्रसंगी त्यांच्या कुटुंबातील आजी-आजोबा, मावशी तसेच त्यांची मुलगी प्रत्यक्ष उपस्थित होती, ही बाब अधिकच हृदयस्पर्शी ठरली. आपल्या घरातील लेक पहिल्यांदाच इतक्या मोठ्या व्यासपीठावर जबाबदारी पार पाडताना पाहण्याचा अभिमान आणि आनंद त्यांच्या कुटुंबियांच्या डोळ्यांत स्पष्टपणे झळकत होता. हा क्षण केवळ वैयक्तिक यशाचा नव्हे, तर कुटुंबाच्या संस्कारांचा आणि पाठबळाचा उत्सवही होता. अशा प्रकारचे सादरीकरण हे केवळ आर्थिक धोरणांची मांडणी नसून, समाजाप्रती असलेली जबाबदारी आणि दूरदृष्टी दर्शवणारे आहे. मेघना कावली यांचे हे पाऊल निश्चितच प्रेरणादायी असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी आशादायी दिशा दर्शवते.

अर्थसंकल्पातील ठळक बाबी
एकूण अर्थसंकल्प- 23 कोटी 26 लक्ष रुपये
पाणीपुरवठा विभागासाठी सर्वाधिक 4 कोटी 65 लक्ष रुपये
सामाजिक न्याय व दिव्यांग कल्याणासाठी मिळून 2 कोटी 72 लक्ष रुपये

प्राधान्याच्या योजना
प्रज्ञा प्रकल्प- विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन
आधुनिक शेती- ड्रोन, प्रिसीजन फार्मिंग
आरोग्य सेवा- आरोग्यदूत उपक्रम, क्षयरोगमुक्त गाव अभियान

