राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून 6 हजार 911 प्रकरणे सामोपचाराने निकाली 

• लोकअदालतीत 21 कोटी 2 लाख 95 हजार 297 रकमेची तडजोड

• कौटूंबिक वादाच्या 21 प्रकरणात तडजोड तर 9 दांपत्यानी घेतला एकत्र नांदण्याचा निर्णय 

नांदेड  : -नांदेड जिल्ह्यातील सर्व न्यायालयात शनिवार 28 सप्टेंबर 2024 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीमध्ये नांदेड जिल्हयामध्ये एकुण 6 हजार 911 प्रकरणे सामोपचाराने निकाली निघाली. या प्रकरणात एकूण 21 कोटी 2 लाख 95 हजार 297 रुपये (अक्षरी एकवीस कोटी दोन लाख पंच्यान्नव हजार दोनशे सत्यान्नव केवळ) इतक्या रकमेबाबत विविध प्रकरणांत तडजोड झाली.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे आदेशान्वये नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुरेखा कोसमकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते. दिवाणी, फौजदारी, धनादेश अनादरीत झालेली प्रकरणे, बॅंक प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसानभरपाई, भूसंपादन, ग्रामपंचायतीचे घरपट्टी व पाणीपट्टीचे प्रकरणे तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय व ग्राहक तक्रार मंच येथील प्रलंबीत प्रकरणांचा व नांदेड वाघाळा महानगर पालिका, पंचायत समिती व ग्रामपंचायतींचे वसुली प्रकरणे, विविध बॅंकांचे तसेच विद्युत प्रकरणे, दुरसंचार विभागाची टेलिफोन, मोबाईल यांचे दाखलपुर्व प्रकरणे इत्यादींचा समावेश होता.

तसेच पाच दिवस घेण्यात आलेल्या विषेश मोहीमेअतंर्गत 573 प्रकरणे निकाली काढण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या लोकअदालतीमध्ये नांदेड जिल्ह्यातील पती-पत्नीचे कौटुंबिक वादाची एकूण 21 प्रकरणे आपसात तडजोडीने मिटविण्यात आली. त्यापैकी 9 वैवाहिक दांपत्यांनी आपसातील वाद संपवून पुन्हा एकत्र येवून संसाराची सुरुवात करण्याचा निर्णय लोकअदालतीच्या माध्यमातून घेतला.

या लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढून लोकअदालत यशस्वी करण्यासाठी प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा सुरेखा कोसमकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दलजीत कौर जज, मुख्यालयातील व तालुकास्तरावरील सर्व न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश यांनी विषेश प्रयत्न केले.

जिल्हा न्यायाधीश-1, सी.व्ही. मराठे यांनी लोकअदालत उद्घाटन समारंभासाठी उपस्थित पक्षकारांना लोकअदालतीचे महत्व समजावून आपली प्रकरणे तडजोडीने मिटवून घेण्याचे आवाहन केले. नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव, श्रीमती दलजीत कौर जज यांनी उपस्थित असलेल्या सर्व पक्षकार तसेच सर्व न्यायाधीश, विधीज्ञ, सर्व न्यायालयीन कर्मचारी यांनी परीश्रम घेतलेले तसेच लोकअदालत यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानुन यापुढेही अशाच सहकार्याची आपेक्षा व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!