अर्धापूर (प्रतिनिधी): -घराच्या बाजूस कचरा का टाकता, असे विचारल्याच्या रागातून सहा जणांनी एकत्र येत शिवीगाळ करून लाकडी रॉड व काठीने मारहाण केल्याची घटना अर्धापूर तालुक्यातील देगाव (खु.) येथे घडली. या प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास देगाव (खु.) येथे ही घटना घडली. फिर्यादी सोपान चुडाजी कदम (वय ३०, रा. देगाव खु., ता. अर्धापूर) यांच्या घराच्या बाजूस कचरा का टाकता, अशी विचारणा केल्याच्या कारणावरून आरोपींनी त्यांच्यासोबत वाद घातला.
या वादाचे रूपांतर शिवीगाळ व मारहाणीत झाले. आरोपींनी फिर्यादी तसेच साक्षीदारांना जिवे मारण्याच्या उद्देशाने लाकडी रॉड व काठीने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी शिवाजी विठ्ठल कदम, सोनाजी शिवाजी कदम, बालाजी देवराव कदम, दत्ता देवराव कदम, अक्षय बालाजी कदम आणि गजानन शिवाजी कदम (सर्व रा. देगाव खु., ता. अर्धापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४७९/२०२६ नोंदविण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम १०९(१), ११८(२), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२)(३), १८९(२)(४)(६), १९० व १९१(२)(३) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक मांजरमकर करीत आहेत.
