कंधार(प्रतिनिधी)-पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा मानसिक छळ केल्याने तिने आत्महत्या केल्याच्या प्रकरणात न्यायालयाने पतीला दोषी ठरवत चार वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. हा निकाल जिल्हा न्यायालयाने दिला असून आरोपीला दंडाचीही शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मडकी येथील अंबिका हिचा विवाह वडेपुरी येथील ज्ञानेश्वर पांचाळ याच्यासोबत झाला होता. विवाहानंतर सुरुवातीचे काही दिवस संसार सुरळीत सुरू होता. मात्र त्यानंतर आरोपी ज्ञानेश्वर पांचाळ हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा वारंवार मानसिक छळ करू लागला. तू एवढ्या लवकर गरोदर कशी राहिलीस? असे म्हणत तो पत्नीवर संशय व्यक्त करीत असल्याचे तपासात समोर आले.
पतीकडून सातत्याने होणार्या मानसिक त्रासाला कंटाळून अंबिका हिने स्वतःला पेटवून घेतले. गंभीर भाजलेल्या अवस्थेत तिला उपचारासाठी विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी दिलेल्या जबाबाच्या आधारे सोनखेड पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणात आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 498-अ, 304(ब) तसेच इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
सुनावणीदरम्यान सरकार पक्षाने एकूण 10 साक्षीदारांची तपासणी केली. साक्षीदारांचे जबाब, पुरावे आणि युक्तिवाद यांचा विचार करून जिल्हा न्यायाधीश एम. एन. पाटील यांनी आरोपी ज्ञानेश्वर पांचाळ याला भारतीय दंड संहितेच्या कलम 306 अन्वये दोषी ठरविले. न्यायालयाने आरोपीस चार वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपयांचा दंड, तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ऍड. महेश कागणे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. त्यांना पोलीस कर्मचारी एम. ए. शंकर यांनी सहकार्य केले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे महिलांवरील अत्याचार व मानसिक छळाच्या प्रकरणांमध्ये कठोर संदेश गेला असून पीडितांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने हा निकाल महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
