बेटी बचाओ बेटी पढाओ,नारी वंदनचा ढोल आणि सत्तेचा नंगानाच: केंद्रीय मंत्र्यांच्या पुत्राचे पोक्सो कांड आणि मोदींचे मौन!

पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा व्यासपीठावरून नारी शक्ती, नारी वंदन आणि बेटी बचाओ, बेटी पढाओच्या घोषणा देतात, तेव्हा असे वाटते की या देशातल्या लेकीबाळी आता खरोखरच सुरक्षित आहेत. पण त्याच व्यासपीठावर जेव्हा एका बलात्काराच्या आरोपीचा बाप मोदींच्या खांद्याला खांदा लावून बसतो, तेव्हा त्या घोषणांची आणि संस्कृतीची लक्तरे वेशीवर टांगली जातात. हैदराबादच्या भूमीवर शक्तीचा जागर करणाऱ्या पंतप्रधानांच्या बाजूला असा एक चेहरा बसला होता, ज्याच्या मुलाने एका १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा गंभीर आरोप आहे. हा केवळ एक गुन्हा नाही, तर तो या व्यवस्थेच्या तोंडावर मारलेली चपराक आहे आणि सत्तेच्या नशेचा सर्वात विकृत आविष्कार आहे.

सत्तेचा माज आणि अल्पवयीन मुलीची अब्रू

केंद्रीय गृहराज्यमंत्री बंदी संजय कुमार यांचा २५ वर्षांचा मुलगा, भगीरथ बंदी. हा तोच लाडका मुलगा आहे, ज्याने हैदराबादमधील आपल्या फार्म हाऊसवर एका १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन रात्रभर तिच्यावर अत्याचार केले. हे प्रकरण केवळ एका गुन्ह्यापुरते मर्यादित नाही, तर ते पोक्सो (POCSO) कायद्याच्या अंतर्गत येते. एका बाजूला पंतप्रधान बेटी बचाओचा नारा देतात आणि दुसरीकडे त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्र्याचा मुलगा एका बेटीची अब्रू लुटतो, हे या देशाचे दुर्दैव नाही तर काय? ज्या गृह मंत्रालयाकडे देशाची सुरक्षा आणि कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आहे, त्याच मंत्रालयाचे डिप्टी मिनिस्टर आपल्या मुलाचे हे काळे कृत्य लपवण्यासाठी सत्तेचा वापर करत आहेत, असा आरोप आता सर्वसामान्यांमधून होत आहे.

व्यासपीठावरील ढोंगीपणाचा कळस

सर्वात संतापजनक गोष्ट म्हणजे, ज्यावेळी हैदराबादमध्ये भगीरथ बंदीच्या अटकेसाठी आंदोलने होत होती, रस्ते जाम केले जात होते आणि संपूर्ण शहर संतापाने खदखदत होते, त्याच वेळी पंतप्रधान मोदी त्याच शहरात एका भव्य सभेत भाषण करत होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ज्या मंत्र्याच्या मुलावर हा भीषण आरोप आहे, ते बंदी संजय कुमार मोदींच्या अगदी शेजारी मंचावर विराजमान होते. मोदींनी आपल्या भाषणात एकदाही त्या पीडित मुलीचा उल्लेख केला नाही किंवा आपल्या सहकाऱ्याला साधी समज देण्याचे धाडसही दाखवले नाही.  ज्या नारी वंदनाच्या गप्पा आपण ऐकतो, ती वंदना नेमकी कोणाची? सत्तेत बसलेल्या गुन्हेगारांच्या बापांची की ज्या लेकीवर अन्याय झाला तिची?

कायदा फक्त आम आदमीसाठीच का?

या देशात कायदा काय फक्त गरिबांसाठी आणि सामान्य माणसांसाठीच आहे का?  जर एखाद्या सामान्य माणसाच्या मुलाने असा गुन्हा केला असता, तर आतापर्यंत त्याच्या घरावर बुलडोझर चालला असता. पण इथे तर आरोपी चक्क १० दिवसांपासून गायब आहे. सूत्रांच्या हवाल्याने असे समोर येत आहे की, हा राजपुत्र सध्या दुबईत सुरक्षित आश्रयाला आहे. अटकपूर्व जामीन मिळेपर्यंत तो मायदेशी परतणार नाही, अशी व्यवस्था सत्ताधाऱ्यांनी केली आहे. पोलीस एफआयआर दाखल करायला घाबरत होते, कारण ज्यांच्या विरोधात तक्रार होती, ते स्वतः देशाचे नंबर टू  गृहमंत्री अमित शहांचे खास मानले जातात. जर तेलंगणामध्ये काँग्रेसचे सरकार नसते, तर कदाचित हा गुन्हा कधी नोंदवलाच गेला नसता.

आयटी सेलचा बदनामीचा उद्योग

जेव्हा सत्तेचे कवच लाभलेले लोक उघडे पडतात, तेव्हा ते पीडितेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायला सुरुवात करतात. या प्रकरणातही तेच घडले. भाजपच्या आयटी सेलने आणि समर्थकांनी असा प्रचार सुरू केला की, हे केवळ ब्लॅकमेलिंगचे प्रकरण आहे आणि मुलीचे कुटुंब ५ कोटी रुपयांची मागणी करत आहे. पण सत्याचा मुखवटा लवकरच गळून पडला. पीडित मुलगी ज्या कुटुंबातून येते, त्यांचा व्यवसाय ५००-६०० कोटींचा आहे. ती मुलगी स्वतः ३ कोटींच्या गाडीतून फिरते. ज्यांच्याकडे इतकी संपत्ती आहे, त्यांना ५ कोटींसाठी आपली इज्जत लिलावात काढण्याची काय गरज? पण सत्तेच्या नशेने अंध झालेल्यांना हे कळत नाही की प्रत्येक गोष्ट पैशाने विकत घेता येत नाही.

तपास यंत्रणांचा आणि मुख्यमंत्र्यांचा पेच

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी एसआयटी (SIT) स्थापन केली आहे, पण त्यांच्यावरही प्रचंड दबाव असल्याचे दिसते. जर त्यांनी केंद्रीय मंत्र्याच्या मुलावर कडक कारवाई केली, तर उद्या त्यांच्यावर ईडी (ED) किंवा सीबीआयची (CBI) धाड पडेल, अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. सत्तेचा असा वापर लोकशाहीसाठी घातक आहे. जेव्हा पोलीस आणि तपास यंत्रणा मंत्र्यांच्या तालावर नाचू लागतात, तेव्हा सामान्यांनी न्यायाची अपेक्षा कोणाकडून करायची?

जनतेचा आक्रोश आणि उपरोधिक वास्तव

आज हैदराबादच्या भिंतींवर भगीरथ बंदीच्या अटकेचे पोस्टर्स लागले आहेत. कॉलेजच्या मुलींमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण आहे. बेटी बचाओ म्हणणारे पंतप्रधान जेव्हा गुन्हेगारांना संरक्षण देणाऱ्यांच्या पाठीवर हात ठेवतात, तेव्हा ते या देशातील करोडो महिलांचा अपमान करतात. हा बनावटपणा, हा दुटप्पीपणा आता लोकांच्या लक्षात येऊ लागला आहे.

शेवटी प्रश्न हाच उरतो की, हेच का ते अच्छे दिन? जिथे एका मंत्र्याचा मुलगा दिवसाढवळ्या कुणालाही मारहाण करतो आणि रात्री फार्म हाऊसवर मुलींच्या अब्रूशी खेळतो, तरीही तो कायद्याच्या कचाट्यातून सुरक्षित राहतो.मोदीजी, तुमच्या नारी शक्ती च्या घोषणा आता पोकळ वाटू लागल्या आहेत. जर तुमच्या मंत्रिमंडळातील मंत्र्याचा मुलगा अशा प्रकारे ‘पोक्सो’ कायद्याचा आरोपी असेल आणि तुम्ही त्याच्या बापासोबत हसतमुखाने फोटो काढत असाल, तर तुमच्या त्या घोषणांना वाटाण्याच्या अक्षता लावण्याची वेळ आली आहे. जनतेचा हा संताप उद्या कदाचित तुमच्या सत्तेच्या खुर्चीलाही हादरा देईल, हे विसरू नका.

मीडिया विकला गेला आहे की विवेक?

विक्री झालेल्या मीडियाची अवस्था आता इतकी दयनीय झाली आहे की, देशात एक मंत्री तब्बल १० दिवसांपासून गायब असतानाही स्वतःला मुख्य प्रवाहातील मीडिया म्हणवणाऱ्या कोणत्याही चॅनेलला किंवा वृत्तपत्राला त्याची बातमी करण्याची उसंत मिळालेली नाही. हैदराबादमध्ये आंदोलन दिवसेंदिवस मोठं होत आहे, लोक रस्त्यावर उतरले आहेत  पण स्टुडिओतील चर्चा मात्र अजूनही निरर्थक विषयांवरच रंगत आहेत.

किमान इतकं तरी नशीब की सध्या उन्हाळी सुट्ट्या आहेत. महाविद्यालयं सुरू असती, विद्यार्थी मैदानात उतरले असते, तर आंदोलनाची व्याप्ती किती प्रचंड झाली असती याची कल्पनाच करवत नाही. पण मीडिया? तो अजूनही शांत आहे की शांत बसवला गेला आहे?

देशाच्या लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणवला जाणारा मीडिया आज वॉचडॉग नसून लॅपडॉग झाल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे. सत्य शोधण्यापेक्षा TRP आणि मालकांच्या आदेशांची सेवा करण्यातच काही माध्यमं व्यस्त आहेत. आता प्रश्न एकच  मीडिया विकला गेला आहे की विवेक?

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!