नवीन नांदेड (प्रतिनिधी)- शहरालगतच्या मित्रनगर, बळीरामपूर परिसरात काल रात्री घडलेल्या हल्ल्यात ३० वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मित्रनगर परिसरात वास्तव्यास असलेला विजय साहेबराव शिंदे (वय ३०) हा युवक काही दिवसांपूर्वी तुरुंगातून सुटून घरी परतला होता. काल रात्री उशिरा अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्ल्यामागील कारणांचा शोध पोलीस घेत आहेत. संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, या घटनेमुळे मित्रनगर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांकडून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. Kanthak Suryatal Post Views: 2,622 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड जिल्हा पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सदा आकुलवार यांचे निधन प्रताप गायकवाडचा खून करणाऱ्या तिघांना पोलीस कोठडी