श्री दत्त शिखर संस्थानचे महंत प. पू. मधुसूदनजी भारती महाराज वैकुंठवासी

श्रीक्षेत्र माहूर (प्रतिनिधी) श्री दत्त शिखर संस्थानचे महंत प. पू. मधुसूदनजी भारती गुरु अच्युत भारती महाराज (95)हे शनिवार, दि. ४ एप्रिल रोजी दु.सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास इहलोक सोडून वैकुंठवासी झालेत.त्यांच्या इहलोकी जाण्याने असंख्य भक्तगन शोकसागरात बुडाले आहेत.

स्वर्गीय महंत प. पू. अच्युत भारती महाराज हे वैकुंठवासी झाले नंतर प. पू.मधुसूदनजी भारती महाराज हे सन 1978 साली संस्थानच्या धार्मिक प्रक्रियेनुसार गादीवर विराजमान झाले होते.अत्यंत साधेपणा, अध्यात्मिक चिंतन आणि भक्तीभावासाठी ओळखले जात होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात श्री दत्त शिखर संस्थानच्या धार्मिक परंपरा जपण्याबरोबरच भक्तांच्या सेवेसाठी स्वतःला अर्पण केले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक धार्मिक उपक्रम, पूजा-अर्चा, तसेच उत्सव मोठ्या श्रद्धा आणि शिस्तीत पार पडत होते.

महाराजांच्या प्रवचनांमधून त्यांनी अध्यात्म, नैतिक मूल्ये आणि संस्कार यांचा संदेश भाविकांपर्यंत पोहोचवला. त्यांच्या साध्या जीवनशैलीमुळे आणि प्रेमळ स्वभावामुळे ते सर्वांच्या मनात विशेष स्थान निर्माण करू शकले होते.त्यांच्या निधनाची बातमी समजताच माहूर व परिसरातील भाविकांनी दत्त शिखराकडे धाव घेत अंतिम दर्शनासाठी मोठी गर्दी केली. अनेक संत, महंत, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली. दरम्यान, त्यांच्या पार्थिवावर धार्मिक विधीनुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, संस्थानतर्फे पुढील कार्यक्रमांची माहिती लवकरच जाहीर केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. प. पू. मधुसूदनजी भारती महाराज यांच्या जाण्याने अध्यात्मिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्यांच्या स्मृती आणि कार्य भाविकांच्या मनात कायम राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!