नांदेड – पाणी हे सर्वांसाठी अत्यंत गरजेचे आहे. पृथ्वीवर पाणीच नसेल तर सजीव प्राणी, झाडे यांचा विनाश होईल. त्यामुळेच ‘जल है तो जीवन है’ असे मानले जाते. मानवी जीवनात म्हणूनच पाण्याचे महत्व मोठे आहे. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे, सर्व नैसर्गिक स्त्रोतांचा अतिवापर आणि जलशोषणामुळे मानवाला पाण्याच्या तीव्र टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. हे संकट भविष्यात आणखी वाढू शकते. पाणी हा सर्व सजीवांच्या अस्तित्वाचा एक महत्त्वाचा घटक असल्याने, पाण्याचे महत्त्व आणि त्यानुसार त्याची उपयुक्ततता याविषयी बालवयातच जागरूकता निर्माण करण्यासाठी जवळ्यात २२ मार्च हा ‘जागतिक जल दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, प्राथमिक पदवीधर शिक्षिका संगिता बडवणे, विषय शिक्षक उमाकांत बेंबडे, सहशिक्षक संतोष घटकार, हैदर शेख, मनिषा गच्चे, मारोती चक्रधर, हरिदास पांचाळ, इंदिरा पांचाळ आदींची उपस्थिती होती.
जागतिक जल दिनानिमित्त जवळा देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत चिमुकल्यांनी जलरक्षक म्हणून कार्यरत राहण्याची जलशपथ घेतली. यावेळी बोलतांना मुख्याध्यापक ढवळे म्हणाले की, शालेय वयातच याबाबतीत योग्य संस्कार व्हावेत यासाठी मुलांना शपथ दिली जाते. जागतिक जल दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश हा २०३० पर्यंत सर्वांसाठी पाणी आणि स्वच्छता हे आहे. त्यासाठी पाणी जपून वापरणे आणि पाण्याची जास्तीत जास्त बचत करण्याला समर्थन करणे तसेच पाणी वाचवणे हे किती गरजेचे आहे, याचे महत्व लोकांना पटवून देणे हे देखील गरजेचे आहे. पाणी हे आपल्या सर्वांचे जीवन आहे. ते आपले मूळ स्त्रोत आहे. पाण्याच्या अभावामुळे अनेक समस्या येऊ शकतात. पाण्याशिवाय लोकांचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते. त्यामुळे, याबद्दल लहान मुलांसह प्रौढ लोकांमध्येही जागरूकता निर्माण करणे आणि लोकांना याचे महत्व पटवून देणे गरजेचे आहे.
जलरक्षक म्हणून अशी घेतली जलशपथ
मी, पाणी बचतीची व पाण्याचा विवेकी वापर करण्याची प्रतिज्ञा करत आहे. मी, पाण्याचा सुयोग्य वापर करण्याची प्रतिज्ञा देखील करीत आहे. तसेच मी, पाण्याचा थेंब अन थेंब साठवेन आणि यासाठी संपूर्ण सहयोग देईन. मी पाण्याला एक अनमोल संपदा मानेन आणि असे समजूनच पाण्याचा वापर करेन. मी अशीही प्रतिज्ञा करत आहे की, मी माझे कुटुंबीय, मित्र आणि शेजाऱ्यांना पाण्याचा विवेकी वापर करण्याबाबत व पाण्याचा अपव्यय टाळण्याबाबत प्रेरित करेन. तसेच त्यासाठी सर्व आवश्यक प्रयत्न करेन. ही वसुंधरा आपली आहे. आपणच या वसुंधरेला वाचवू शकतो आणि आपले भविष्य सुरक्षित करू शकतो. यासाठी मी देशाचा जलरक्षक म्हणून कायम कार्यरत राहण्याची शपथ घेत आहे.
