राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालयात  बहिरेपणा असलेल्या बालकांना श्रवणयंत्र वाटप  

नांदेड – राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत आयोजित शिबिरात नांदेड जिल्ह्यातील ७३ बालकांची तपासणी करण्यात आली असून ६० श्रवणयंत्रासाठी पात्र झालेल्या बालकांना आज २० जानेवारी रोजी जिल्हा रुग्णालय नांदेड येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके यांच्या हस्ते श्रवणयंत्र वाटप करण्यात आले आहे. या बालकांना वेळेत श्रवणयंत्र उपलब्ध करून दिल्याने त्या बालकांना ऐकू येण्यास मदत होणार असल्यामुळे पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

राज्यात शालेय आरोग्य तपासणी हा कार्यक्रम यशस्वी ठरल्याने व कुपोषणाचा प्रश्न गंभीर असल्यामुळे बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यातील ४५ आरोग्य पथकांद्वारे वर्षातून २ वेळा अंगणवाडीतील व एकवेळा शाळेतील बालकांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. ० ते १८ या वयोगटातील बालाकंची 4D म्हणजे जन्मतः व्यंग, पोषणमुल्यांची कमतरता, शाररीक व मानसिक विकासात्मक विलंब, आजार यांचे निदान व उपचार करण्यात येतात. याचाच एक उपक्रम म्हणून १६ ऑक्टोबर २०२५  रोजी जिल्हा रुग्णालय नांदेड येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पांडुरंग पावडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाभाऊ बुट्टे यांच्या नेतृत्त्वाखाली जन्मजात बहिरेपणाचा आजार असलेल्या बालकांचे तपासणीचे शिबीर जिल्हा रुग्णालय नांदेड येथे घेण्यात आले होते.

हृदयरोग तपासणी (2D ECHO) ,नेत्र रोग, आकडी/फेफरे यांची मोठ्याप्रमावर शिबिरे आयोजीत करून निदान व औषधोपचार करण्यात येते. जिल्ह्यातील अनेक मुला-मुलीना या कार्यक्रमाचा मोफत लाभ झालेला असून त्यात अनेक जणांवर हृदय शस्त्रक्रिया व इतर शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यातील अंगणवाडी तपासणी दरम्यान कुपोषित बालकांना निदान व औषधोपचार करून श्रेणीवर्धन करण्यासाठी पोषण पुनर्वसन केंद्र स्त्री रुग्णालय श्यामनगर नांदेड येथे संदर्भित करण्यात येऊन त्यांच्या पालकास बुडीत मजुरीचा लाभ देण्यात येतो.  तसेच जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र अंतर्गत ० ते ०६ वर्ष वयोगटातील ज्या बालकांना जन्म जात आजार, अवयवांच्या उणीवा आणि विकास/वाढीचा अभाव आढळलयास त्यांच्यावर वेळीच शस्त्रक्रिया/औषधोपचार करून भविष्यात त्यांना शरीराच्या गुंतागुंतीच्या आजार किंवा उणीवापासून दूर ठेवणे शक्य होत आहे. या शिबिरासाठी अनिल कांबळे RBSK समन्वयक, विठ्ठल तावडे DEIC व्यवस्थापक, श्रीमती अनिता चव्हाण तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत असलेले वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!